ETV Bharat / state

शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित; पवनी तालुक्यातील प्रसिद्ध ऋषीपंचमीची यात्रा रद्द

author img

By

Published : Aug 22, 2020, 7:20 PM IST

Pauni rishi panchami yatra cancel due to corona pandemic
शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित

ऋषि पंचमीला वैजेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेला दूरवरून हजारो महिला वैनगंगा नदी तीरावर असलेल्या घाटावर पवित्र स्नान करायला येत असतात. मात्र या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोविड-19 ला आळा बसावा म्हणून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

भंडारा - विदर्भाची 'काशी' पवनी येथे दरवर्षी भाद्रपद शु. 5 ला ऋषि पंचमीला वैजेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेला दूरवरून हजारो महिला वैनगंगा नदी तीरावर असलेल्या घाटावर पवित्र स्नान करायला येत असतात. मात्र या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोविड-19 ला आळा बसावा म्हणून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. यामुळे यावर्षी ऋषीपंचमीच्या यात्रेला स्थगिती देण्यात आली असल्याचे तहसीदार निलिमा रंगारी यांनी सांगितले.

दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आदेश जिल्हाधिकारींनी पारित केले आहेत. यामुळे मंदिर समितीने अथवा परस्पर कोणीही ऋषी पंचमीची यात्रा भरवू नये. तसेच दूरवरून येणाऱ्या महिला भगिनींनी सुरक्षेच्या कारणाने तसेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी वैनगंगेचे तीरावर असलेल्या वैजेश्वर मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार निलिमा रंगारी यांनी केले आहे.

शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित

दरवर्षी ऋषिपंचमीला पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील पंचवीस ते तीस हजार महिला भगिनी आंघोळीला व पूजा करण्याकरिता येत असतात. या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यात फिजिकल डिस्टनसिंग पाळणे शक्य होणार नाही. तसेच सर्वजण एकाच ठिकाणी आंघोळ करतात. या सर्व गोष्टीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. जिल्ह्याबाहेरील हजारो लोक पवनीमध्ये येतील. त्यामुळे पवनी शहरात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी भरणाऱ्या यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे शेकडो वर्षाची परंपरा खंडित झाली आहे.

दरम्यान, यात्रा रद्द केल्यानंतर ही काही भाविक येण्याची शक्यता आहे. अशा भाविकांना थांबविण्यासाठी रस्ते बंद केले जातील आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचे तहसीलदार रंगारी यांनी सांगितले. पवनी शहरातील सर्व नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पवनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र ढाके, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे उपस्थित होते.

हेही वाचा - . . अखेर सनफ्लॅग कंपनी 10 दिवस बंद; नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

हेही वाचा - भंडाऱ्यात पावसाचे तांडव; बोधरा तलाव फुटला, सातही तालुक्यात अतिवृष्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.