ETV Bharat / state

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला भंडारामध्ये संमिश्र प्रतिसाद

author img

By

Published : Dec 8, 2020, 5:09 PM IST

शेतकऱ्यांतर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात मागील 13 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

protest
भारत बंदला भंडारामध्ये संमिश्र प्रतिसाद

भंडारा - शेतकऱ्यांतर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. भंडारा, पवनी या शहरात मंगळवार असल्यामुळे बाजारपेठ बंद होत्या. मात्र, खासगी भाजीबाजारात व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी बंदला झुगारून भाजी विक्रीसाठी आणली होती. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटना, विदर्भवादी संघटना, यांनी समर्थन दाखवत निदर्शने केले.

भारत बंदला भंडारामध्ये संमिश्र प्रतिसाद

संमिश्र प्रतिसाद मिळाला

सरकारनी शेतकरी विरोधी कायदा केला असून तो रद्द करावा या मागणीला घेऊन देशातील शेतकरी संघटनांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यांमध्ये या देशव्यापी बंदचे संमिश्र पडसाद पाहायला मिळाले. कारण भंडारा आणि पवनी शहरातील बाजारपेठ ही मंगळवारी बंद असते. त्यामुळे बाजारपेठ बंद होती असे म्हणता येणार नाही. मात्र, भंडाराची सर्वात मोठी खासगी भाजी मार्केटमध्ये या बंदचा अजिबात परिणाम पहायला मिळाला नाही. येथील व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी आणला होता. आम्ही शेतकरी आहोत आमच्या दररोजच्या भाजी विक्रीतून आमचे कुटुंब चालते. त्यामुळे या बंदशी आमचा काहीएक संबंध नसल्याचे व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

भाजप सोडून सर्वपक्ष उतरले रस्त्यावर

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, विदर्भवादी संघटना आणि इतर संघटनांनी या बंदला समर्थन देत निदर्शन केले. भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करून काही काळ वाहतूक ठप्प ठेवण्यात आली. पवनी तालुक्यात रस्त्यावर टायर आडवे करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून निदर्शने केली. तर साकोलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून शासनाच्या या शेतकरी कायद्याचा निषेध नोंदविला.

केंद्र सरकारने केलेला कायदा हा शेतकऱ्यांना गुलाम बनवणारा आणि अदानी, अंबानींसारख्या उद्योजकांना श्रीमंत बनण्यासाठी केलेला कायदा असून, शेतकऱ्यांनी याचा विरोध केला आहे. आम्ही केवळ त्यांना आपले समर्थन देत आहोत. ज्या शेतकऱ्यांनी भाजपला भरभरून मतं दिली तो भाजप आज या बंदला विरोध करत आहे. त्यामुळे भाजप शासन हे शेतकरीविरोधी असून येत्या निवडणुकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवतील असे यावेळेस आंदोलकांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.