भंडारा - भंडारा शहरातील प्रॉपर्टी डीलर समीर दास यांची 14 एप्रिलला हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गूढ भंडारा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उलगडले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोकेश काणसे यांनी दिली.
हेही वाचा - गिरोला येथील स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा आरोप
राहुल गोवर्धन भोंगाडे (वय २६ रा. सुभाष वार्ड, शुक्रवारी भंडारा), श्रीकांत मदनलाल येरणे (वय ३१ रा. चुरडी, ता. तिरोडा) व आकाश रमेश महालगावे (वय २३ रा. अभ्यंकर वॉर्ड, सुभाष पुतळ्याजवळ तुमसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चार लाखात दिली हत्येची सुपारी.
प्रॉपर्टी व्यवसायी समीर दास हे मुळचे कोलकाता येथील रहिवासी असून ५० वर्षांपूर्वी ते भंडारा येथे आले होते. ते अनेक वर्षांपासून जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात होते. त्यातून त्यांचे बऱ्याच जणांशी वाद झाले होते आणि त्या वादातून न्यायालयात प्रकरणे दाखल होते. असेच एक प्रकरण राहुल गोवर्धन भोंगाडे याची आजी आणि दास यांच्यात सुरू होते. हे प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणात समीर दास यांनी आपल्या कुटुंबाची फसवणूक केली, असा समज राहुल भोंगाडे याचा झाला. समीर दास मेला तर आपल्याला करोडो रुपयांचा फायदा होईल, असे राहुलला वाटत होते. यामुळेच राहुलने दास यांचा काटा काढण्याचे ठरविले व त्याने समीर दास यांना ठार मारण्याची सुपारी श्रीकांत मदनलाल येरणे याला 4 लाख रुपयांत दिली होती. त्यातील 2 लाख रुपये आगाऊ दिले होते.
हत्येचे दोन वेळा झाले प्रयत्न
पैसे मिळताच सुपारी किलर श्रीकांत येरणे याने २० फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र . ६ वर वेदा लॉन समोर समीर दास हे त्यांच्या अॅक्टीवा मोपेड गाडीने जात असतांना त्यांना कारने धडक देवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, समीर दास हे त्यातून बचावले. त्यानंतर श्रीकांतने त्याचा तुमसर येथील मित्र आकाश रमेश महालगावे याच्या मदतीने समीर दास यांना ठार मारण्याचा कट पुन्हा रचला. दुसऱ्या कटानुसार ४ एप्रिल २०२१ रोजी आरोपी श्रीकांत येरणे व आकाश उर्फ डिगरा महालगावे हे दुपारी १.३० वाजताच्या सुमारास समीर दास यांच्या पोस्ट ऑफिस भंडाराजवळील कार्यालयात गेले होते. तेथे समीर दास हे हजर नव्हते. तेव्हा दोन्ही आरोपींनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवरून समीर दास यांच्याशी बोलणी करून त्यांना बेला येथे प्लॉट विकत घ्यावयाचे आहे, असे सांगितले. त्यावेळी समीर दास यांनी त्यांना रॉयल पब्लिक शाळेजवळ बोलविले. तेथून तिघेही बेला राजीव नगर येथील ले ऑऊटवर पोहचल्यानंतर बोलता बोलता श्रीकांत येरणे याने त्याच्या जवळील चाकूने समीर दास यांच्या मानेवर जोरात वार केला. त्यानंतर शरीरावर बरेच वार त्यांच्यावर करण्यात आले. त्यावेळी समीर दास यांना ओरडण्याची किंवा बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही व ते खाली कोसळले. त्यानंतर आरोपी हे तेथून पळून गेले. आरोपींनी ही हत्या अवघ्या २० मिनीटात केली.
तिन्ही आरोपींना अटक
या प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली असून १६ एप्रिल २०२१ पर्यंत तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे करीत आहेत. कारवाईसाठी पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे ठाणेदार लोकेश काणसे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस स्टेशन भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगने, हवालदार भुसावळे, नायक प्रशांत भोंगाडे, अतुल मेश्राम यांनी प्रयत्न केले.
हेही वाचा - भंडारामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची पदयात्रा काढून कोरोनाबाबत जनजागृती