ETV Bharat / state

ऐन हिवाळ्यात मराठवाड्यातील पाणीप्रश्न पेटला, हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं 'रास्ता रोको' आंदोलन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 8:15 PM IST

Marathwada Water Issue
पाण्यासाठी आंदोलन

Marathwada Water Issue: जायकवाडीला हक्काचं पाणी द्या, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी आज (सोमवारी) 'रास्ता रोको' आंदोलन केलं. (Rasta Roko agitation of All Party Leaders) तर आंदोलक ऐकत नसल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी नगर आणि नाशिकच्या धरणांमधून लवकर पाणी सोडा, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली. (agitation for Water in Chhatrapati Sambhaji Nagar)

छत्रपती संभाजी नगरच्या पाणीप्रश्नावर बोलताना आमदार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Marathwada Water Issue: यंदा मराठवाड्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट गोंगवत आहे. जायकवाडी धरणात क्षमतेच्या अर्धच पाणी शिल्लक असल्यानं शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार नगर, नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडा अशी मागणी गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आली; मात्र पाणी सोडता येणार नाही अशी भूमिका घेत नगर आणि नाशिकच्या राजकीय नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरला पाणी सोडण्याचे निर्देश दिले. तरीदेखील अद्याप नगर आणि नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आलं नाही. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत आकाशवाणी जवळ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनात आमदार राजेश टोपे, आमदार संजय शिरसाट, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अर्जुन खोतकर, कल्याण काळे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला.


वेळेवर पाणी न सोडल्यास होणार नुकसान: पर्जन्यमान कमी झाल्यास धरणांमध्ये पाण्याचा साठा पाहून पाणी सोडण्याचा नियम आहे. असं असलं तरी मराठवाड्यात दुष्काळ पडल्यावर भांडण्याची वेळ नेते आणि नागरिकांवर येते. यंदा साडेआठ टी.एम.सी पाणी नगर आणि नाशिकच्या धरणांमधून सोडण्याचे निर्देश आहेत. मात्र, अद्याप पाणी सोडण्यात आलेलं नाही. आता जर पाणी सोडलं तर अवघ साडेपाच टीएमसी पाणी जायकवाड धरणात दाखल होईल. उर्वरित तीन टी.एम.सी पाणी नदीपात्रात मुरणार आहे. जसजसा वेळ जाईल तसं पाण्याचं नुकसान अधिक होणार आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी केली.


पाणी सोडण्यास मुद्दाम होतोय उशीर: 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आलेलं नाही. उच्च न्यायालयात नगर आणि नाशिकच्या वतीनं टाकण्यात आलेल्या याचिकेवर कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. तरीदेखील 20 दिवस झाले तरी पाणी सोडण्यात आलेलं नाही. नगर आणि नाशिकच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुद्दाम सरकार वेळ देताय का? असा आरोप आमदार राजेश टोपे यांनी केला. तर लवकर पाणी सोडलं नाही तर मराठवाड्यातला कुठलाच आमदार अधिवेशनात सहभाग घेणार नाही, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.

हेही वाचा:

  1. "मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, माझ्याकडे आणखी 27 फोटो आहेत"; बावनकुळे प्रकरणावरुन राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
  2. बागेश्वर महाराजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, अंनिसच्या प्रश्नावर म्हणाले, हनुमानजींच्या नावावर चमत्कार झाला तर रोखू शकत नाही
  3. रेस्टॉरंट आणि कसिनो एकच; राऊतांच्या पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.