ETV Bharat / state

Congress Allegation On Sambhaji Bhide: 'संभाजी भिडे म्हणजे भाजपने सोडलेला वळू': काँग्रेसचा आरोप

author img

By

Published : Aug 2, 2023, 5:44 PM IST

Congress Allegation On Sambhaji Bhide
कॉंग्रेस पत्रपरिषद

मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी होत आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना लोकांचे लक्ष भरकटविण्यासाठी संभाजी भिडे नावाचा वळू भाजपने महाराष्ट्रात सोडला असल्याचा आरोप अमरावतीत काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केला आहे.

कॉंग्रेसच्या पत्रपरिषदेतून संभाजी भिडे आणि भाजपवर टीका

अमरावती : भाजपच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध चुकीचे आरोप केले जात असल्याने त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज (बुधवारी) खास पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये दिलीप येडतकर यांच्यासह काँग्रेसचे अन्य प्रदेश प्रवक्ता मिलिंद चिमोटे यांनी संभाजी भिडे यांचा महाराष्ट्र दौरा हा भाजपनेच प्रायोजित केला असल्याचा आरोप देखील केला.

कुळकर्णी, भिडे हे भाजपचे पाळीव गोडसे : राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांवर संभाजी भिडे यांनी टीका केली. संभाजी भिडे यांचे विचार पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात खपणारे नाहीत. त्यांना तात्काळ अटक व्हायला हवी होती; मात्र असे न करता संभाजी भिडे यांच्या समर्थनात अमरावतीत भाजपने आयात केलेला खासदार डॉ. अनिल बोंडे आणि शिवराय कुलकर्णी सारखा प्रवक्ता यांनी गत चार दिवसांपासून वाचाळपणा करुन धुमाकूळ घातला. हे शिवराय कुलकर्णी, संभाजी भिडे ही मंडळी भाजपचे पाळीव गोडसे असल्याची टीका देखील दिलीप एडकर यांनी केली.


'तो' आरोपी मोकाटच : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे विरोधात जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आवाज उठवला. यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कैलास सूर्यवंशी हा युवक ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देतो. त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असताना देखील आता तीन दिवस उलटूनसुद्धा त्याला अटक न होणे हे दुर्दैव आहे. यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा अद्यापही मोकाट फिरतो आहे. याचा अर्थ म्हणजे राज्यातील गृह विभाग अकार्यक्षम असल्याचे सिद्ध होते, असे देखील दिलीप एडकर म्हणाले.

पुरावे सादर करा, नंतर आरोप करा : महाराष्ट्रात कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम हे अमरावती जिल्ह्यात झाले. नागपूर आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरातून शेकडो रुग्ण अमरावतीत उपचारासाठी आले आणि बरे झालेत. असे असताना कोरोना काळात तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केला. केवळ आरोप करण्यापेक्षा तसे पुरावे सादर करून आपल्या बोलण्यात किती अर्थ आहे हे त्यांनी स्पष्ट करावे, असे कॉंग्रेसचे प्रवक्ता मिलिंद चिमोटे म्हणाले. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सर्वांत आधी कोल्हेंच्या घरी यशोमती ठाकूर यांच्या आधी भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी पोहोचले होते. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला. असे असेल तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एनआयए'च्या तपासात यशोमती ठाकूर यांनी प्रकरण दाबल्या संदर्भात तथ्य समोर आले असते; मात्र केवळ समाजात चुकीचा संदेश पसरविण्यासाठी शिवराय कुलकर्णी बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे मिलिंद चिमटे म्हणाले.

हेही वाचा:

  1. Maharashtra Monsoon Session 2023: संभाजी भिडेंवर कारवाई करा, विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करत आंदोलन
  2. MIM On Sambhaji Bhide : महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; एमआयएमने केला संभाजी भिडेंचा निषेध
  3. Ajit pawar group protest : राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनोहर भिडे यांच्या विरोधात आंदोलन; अजित पवार यांच्याकडे करणार लेखी मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.