ETV Bharat / state

'संघटनेतील नाराजी नाट्य हा संपूर्ण नियोजित कार्यक्रम'

author img

By

Published : Jun 21, 2020, 1:02 AM IST

Updated : Jun 21, 2020, 1:44 AM IST

ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याला राजकीयदृष्ट्या संधी मिळते. त्यावेळेस पक्षातील मोठे नेते स्वार्थ जपण्यासाठी बाकीच्या कार्यकर्त्याचा बळी घेतात. असा गंभीर आरोप भुयार यांनी नाव न घेता संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यावर केला आहे.

mla-devendra-bhuyar-on-raju-shetti-in-amravati
'संघटनेतील नाराजी नाट्य हा संपूर्ण नियोजित कार्यक्रम'

अमरावती- राज्यात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागेसाठी निवडणूक होऊ घातली आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, यावरुन शेट्टी यांच्या संघटनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. आमदार देवेंद्र भुयार हे देखील संघटनेवर व राजू शेट्टी यांच्यावर नाराज असल्याचे पुढे आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मनभेद नसले तरी मतभेद असल्याची खंत भुयार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्री पद केवळ संघटनेतील वरिष्ठांच्या स्वार्थापोटी मिळाले नाही, असा आरोपही भुयार यांनी केला आहे. राजू शेट्टी यांच्या आमदारकीला संघटने अंतर्गत झालेला विरोध म्हणजे केवळ ठरलेला कार्यक्रम असल्याचा खुलासाही देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

राज्यात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांना आमदारकी मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर स्वाभिमानीतील काही पदाधिकाऱ्यांनी शेट्टीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. संघटनेचे एकमेव आमदार असलेले देवेंद्र भुयार यांची संघटनेमधील काही लोकांवर तीव्र नाराजी असल्याचे समोर आले आहे. पक्षातील काही नेते स्वार्थासाठी कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोपही त्यांनी नाव न घेता केला आहे.

आजही मी महाविकासआघाडी सोबत आहे कालही होतो उद्याही राहीन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी माझे मनभेद नाहीत पण मतभेद नक्की आहेत. मी जिल्हा परिषद सदस्य असताना संघटनेसाठी काम करत राज्यभर फिरलो. पण आता मी मतदारसंघात फिरत आहे कारण मी मागे महाराष्ट्रभर फिरत असताना, विधानसभा निवडणुकीत मला माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोठा फटका बसला. त्यामुळे मी आता माझ्या मतदारसंघातच काम करत आहे. जिल्हा परिषदेच्या वेळेस राज्यभर फिरलो ही चूक केली. पण आता सावधगिरी बाळगली आहे. मी आता माझ्या मतदारसंघात थांबणार आहे.

ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याला राजकीयदृष्ट्या संधी मिळते. त्यावेळेस पक्षातील मोठे नेते स्वार्थ जपण्यासाठी बाकीच्या कार्यकर्त्याचा बळी घेतात. असा गंभीर आरोपही भुयार यांनी नाव न घेता संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यावर केला आहे. तोच प्रकार माझ्या सोबत घडला आहे असे मला वाटायला लागले आहे, असेही भुयार म्हणाले.

...म्हणून मला मंत्रिपद मिळाले नाही

महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक मंत्रिपद देण्याचे ठरवले होते. पण संघटनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही. मी कुठल्याच जातीवादी, हिंदुत्ववादी पक्षासोबत जाणार नाही. शेती प्रश्नाच्या बाबतीत माहिती लागली तरच मी राजू शेट्टी सोबत बोलतो. रोज आमच बोलणं होत नाही. शेट्टी यांच्या तिकीटावर संघटनेतील कुठलेच नेते नाराज वगैरे काही नव्हते. हा संपूर्ण नियोजित कार्यक्रम आहे, असा धक्कादायक खुलासाही देवेंद्र भुयार यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Last Updated :Jun 21, 2020, 1:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.