ETV Bharat / state

अवकाळीचं ढग कायम; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 11:03 AM IST

Maharashtra Weather Update
पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला असून येत्या दोन दिवसात मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भात अनेक भागात चार दिवसांपासून पाऊस कोसळत असताना आणखी पुढील दोन दिवस विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तसंच अनेक भागात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलीय.

अमरावती Maharashtra Weather Update : अमरावती शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (29 नोव्हेंबर) रात्री दहाच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. मध्यरात्री पावसाचा जोर ओसरल्यावर पहाटे अमरावती शहरात रिमझिम पाऊस बरसला. तर मेळघाटात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, अवकाळी पावसामुळं अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळं बुधवारपासून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती शुकशुकाट पाहायला मिळतोय.


या भागात आज पाऊस कोसळण्याची शक्यता : विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही भागात धुकं राहणार आहे. तसंच अंदमान लगत समुद्रात 1 डिसेंबर रोजी चक्रीवादळ निर्माण होणार आहे. मात्र, या चक्रीवादळाचा विदर्भात विशेष परिणाम जाणवणार नाही, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

चक्राकार वाऱ्याचा प्रताप : दक्षिण अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहतायत. या वाऱ्यापासून केरळ, कर्नाटक मार्गे उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाची दोन्ही स्थिती आहे. तसंच श्रीलंका किनारपट्टीवर चक्राकार वारे असल्यानं बंगालच्या उपसागरातून हवेच्या खालच्या थरातून येणारे वारे, तसंच अरबी समुद्रातून हवेच्या मधल्या थरातून येणारे वारे यांच्या परस्पर संयोगामुळं आणखी दोन दिवस मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. तसंच बंगालच्या उपसागरात 1 आणि 2 डिसेंबरला निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे 4 आणि 5 डिसेंबरला देखील विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचंही प्रा. अनिल बंड म्हणाले.

पिकांवर होणार असा परिणाम : दरम्यान, हा अवकाळी पाऊस तुर आणि कपाशीसाठी फायदेशीर आहे. तसंच हरभरा पिकाची पेरणी करून घेण्यासाठी देखीव हा पाऊस उपयुक्त आहे. ज्या तुरीचं पीक थोडं वाकलं असंल ते वातावरण चांगलं झालं की परत उभं राहू शकतं. उभ्या पिकांवर स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशके यांची फवारणी करणं गरजेचं आहे. एकंदर परिस्थिती पाहता हा पाऊस विदर्भातील पिकांसाठी फायदेशीर असल्याचं श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषी तज्ञ प्राध्यापक राजेंद्र पाटील यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना स्पष्ट केलंय.

हेही वाचा -

  1. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं साडेतीन एकर ज्वारीचं पीक उद्धवस्त ; हातातोंडाशी आलेलं पीक गेलं पाण्याखाली!
  2. नंदुरबारमध्ये वादळी पाऊस! वीज कोसळून तरुणीचा मृत्यू, तर कोट्यवधींची मिरची पाण्यात
  3. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.