Shami Plant Significance: 'शमी'साठीच झाले पहिले चिपको आंदोलन; 'या' झाडाचे आहे धार्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्व

author img

By

Published : May 6, 2023, 6:06 PM IST

Updated : May 6, 2023, 6:31 PM IST

shami tree Significance of importance

राजस्थानमध्ये तसेच तेलंगणात उत्सवात शमीच्या झाडाला फार महत्त्व आहे. भारतात धार्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या शमीच्या झाडाला युनायटेड अरब अमिरात येथे देखील अतिशय महत्त्व आहे. या झाडात नेमके कोणते गुण आहेत या संदर्भात वनस्पती अभ्यासक डॉ. अर्चना मोहन यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.

माहिती देताना डॉ. अर्चना मोहोड

अमरावती: पांडवांनी अज्ञातवासात असताना आपली सर्व शस्त्र शमीच्या झाडावर लपवून ठेवले असल्याचा उल्लेख महाभारतात आहे. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमीच्या झाडावर सुरक्षित असणारे शस्त्र घेतल्यावर त्या शस्त्रांची झाडाखालीच पूजा केली. तेव्हापासून दसऱ्याच्या पर्वावर शमीच्या वृक्षाच्या पानांची पूजा केली जात आहे. भारतात झालेल्या आणि जगभर गाजलेल्या चिपको आंदोलनाची पहिली ठिणगी ही शमीच्या झाडाला वाचवण्यासाठी पडली होती. भारतात धार्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या शमीच्या झाडाला युनायटेड अरब अमिरात येथे देखील अतिशय महत्त्व आहे.



शमीसाठीच झाले पहिले चिपको आंदोलन: राजस्थानमध्ये शमीच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे. 1730 मध्ये जोधपुर जवळ असणाऱ्या खेजरली नावाचे गाव आहे. त्यावेळी तेथील राजा अभयसिंग यांना महाल बांधायचा असल्यामुळे, त्यांच्या राज्यात खेचरली गावाजवळ असणारे जंगल कापण्याचे आदेश त्यांनी दिले. या जंगलात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शमी वृक्षांची कत्तल केली जाणार होती. ती रोखण्यासाठी तेथील बिश्नोई समुदायाच्या महिलांनी सर्वात आधी विरोध केला. बिश्नोई समाजातील अमृता देवी या महिलेसह तिच्या तीन मुली शमीचे झाड तोडू नये म्हणून झाडाला चिपकल्या.राजाच्या सैनिकांनी मात्र त्या चौघींनाही क्रूरपणे ठार मारले.

shami tree Significance of importance
शमीच्या झाडाचे महत्व

363 लोकांना मारून टाकले: यानंतर गावातील सर्व लोक वृक्ष वाचवण्यासाठी झाडांना चिपकले. त्यावेळी राजाच्या सैनिकांनी 363 लोकांना मारून टाकले. प्रजेचा रोष पाहता राजाने त्या भागात महाल बांधण्याचा निर्णय मागे घेतला. शमी वृक्षाला वाचविण्यासाठी झालेले ते आंदोलन अतिशय महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे 1970 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी वृक्ष संवर्धनासाठी जे चिपको आंदोलन सुरू केले, त्याची प्रेरणा ही शमी वृक्षाला वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनातूनच मिळाली असल्याचे डॉ. अर्चना मोहोड यांनी सांगितले.



राजस्थान आणि तेलंगणाचे आहे राज्यवृक्ष: शमी या झाडाला धार्मिक महत्त्व देखील आहे. कर्नाटक राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात या झाडाला खूप महत्त्व आहे. राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांचे शमी हे राज्यवृक्ष आहे. कर्नाटकात दहा दिवस दसरा उत्सव साजरा होतो, त्या उत्सवात शमीच्या झाडाला फार महत्त्व आहे. या झाडाची पूजा केली जाते. दसऱ्याच्या पर्वावर महाराष्ट्रात देखील शमीच्या झाडाच्या पानांची पूजा केली जाते.



यूएई चा राष्ट्रीय वृक्ष: यूएई अर्थात युनायटेड अरब अमीरात या देशाचा शमी हा राष्ट्रीय वृक्ष आहे. यूएई मधील भारी नावाच्या प्रदेशात शमीचे 400 वर्ष जुने झाड आहे. या झाडाला ऐतिहासिक महत्त्व असून दरवर्षी एक लाख लोक हे झाड पाहण्यासाठी जातात. ट्री ऑफ लाईफ असा उल्लेख युएई मध्ये शमीचा केला जातो. या झाडाचा उल्लेख स्टीव्ह मार्टिनचा हॉलीवुड मधील चित्रपट एल ए स्टोरीमध्ये देखील आहे.



या झाडाचे असे आहेत औषधी गुणधर्म: सिझोफ्रेनीय यासारखे मानसिक आजार, यासोबतच अतिसार, डायरिया या आजारात या झाडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्या भागात दुष्काळ राहतो त्या दुष्काळी भागात या झाडाच्या सालीचे पीठ तयार करून त्याच्या पोळ्या केल्या जातात. खाण्यासाठी काहीही उपलब्ध नसते, त्यावेळेस या झाडाची साल ही खाल्ली जाते. ती अतिशय पौष्टिक असते. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे हे झाड ज्यावेळेस लहान असते, त्यावेळेस या झाडाला खूप मोठ्या प्रमाणात काटे असतात, मोठ्या झाडावर मात्र अगदी क्वचित काटे आढळतात. गाई बकऱ्यांना या झाडाचा पाला फार आवडतो.



जुन्याकाळी लोखंडाला होता हा पर्याय: शमी वृक्षाचे लाकूड अतिशय कठोर आहे. जुन्या काळात जेव्हा लोखंड नव्हते, त्यावेळी शमीच्या झाडाच्या अतिशय मजबूत खोडांचा वापर विहिरीची मोट, बैलगाडीचे चाक, तोफेच्या दोन चाकांच्या मधात जे लाकूड असतो, त्याला आख म्हणतात ती आख देखील शमीच्या झाडाच्या खोडांपासूनच तयार केली जात असे. पाण्यामुळे देखील शमीचे लाकूड खराब होत नाही. पूर्वीच्या काळात बांधकामासाठी या वृक्षाच्या लाकडांचा वापर केला जात असल्याची माहिती, डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.



चवदार शेंगा, उष्माघातावर पाल्याचा उपाय: शमीच्या झाडाला लागणाऱ्या हिरव्या शेंगा ह्या खायला अतिशय चवदार आहेत. देश विदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये या शेंगांची भाजी पंधराशे ते दोन हजार रुपये प्लेट प्रमाणे मिळते. शरीरात होणाऱ्या गाठी, मुळव्याध या आजारावर या शेंगा अतिशय गुणकारी आहेत. सुकलेल्या शेंगा देखील एखाद्या बिस्किट प्रमाणे खाण्यासाठी चवदार लागतात. माकड या शेंगा आणि झाडाचा पाला खाण्यासाठी नेहमीच या झाडावर येतात.



वास्तुदोषासाठी फळाचे महत्व: शमीच्या झाडाला लागणारे कळ्या रंगाचे फळ हे सुकल्यावर जमिनीवर पडते. वास्तुदोषासाठी या फळाला अतिशय महत्त्व आहे. सुकलेले हे फळ घरी शेणाच्या गौरीवर जाळले तर घरातील सर्व दोष दूर होतात अशी माहिती देखील डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.

हेही वाचा:

  1. Village Famous For Wheat Production सातपुडा पर्वत रांगेतील हे गाव आहे गव्हाचे कोठार गव्हाच्या उत्पादनामुळे गावाची झाली भरभराट
  2. Moha Tree In Melghat मोहाने आणली मेळघाटात समृद्धी दारूच नाही तर औषधात मोह फुलांचा सर्रास होतो वापर
  3. Gardenia Tergeria Tree Amravati या झाडालाही होतात गुदगुल्या माणसाला अनेक व्याधीतून करते मुक्त काय आहे वैशिष्ट्य
Last Updated :May 6, 2023, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.