ETV Bharat / state

अस्तरीकरण शेततळ्याने दिली शेतीसाठी ऊर्जा; मेळघाटातील मोथा गावातील पहिला प्रयोग

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 8:17 PM IST

Astarikaran Shettale : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana) अंतर्गत, मोथा गावात 'अस्तरीकरण शेततळाचा' पहिला प्रयोग करण्यात आला आहे.

shettale yojana
शेततळे

'ईटीव्ही भारत'नं घेतलेला आढावा

अमरावती Astarikaran Shettale : 1700 ते 2200 मिलीमीटर पाऊस होत असला तरी, उंच पहाडावर असणाऱ्या मेळघाटातील अनेक गावातले पाणी खाली वाहून जाते. अशा परिस्थितीत शेतीसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळं शेती करणं मोठं कठीण काम आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या मोथा या गावात उत्तमराव येवले यांच्या शेतात अस्तरीकरणाचे शेततळे बांधण्यात आले आहे. पीक कसं घ्यावं शेती परवडत नाही, अशा विवंचनेत असणाऱ्या येवले यांच्या शेतात अस्तरीकरण शेततळे तयार होताच, आता शेतीसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. चांगले उत्पन्न होईल अशा विश्वासाने उत्तमराव येवले हे नव्या जोमाने शेती करायला लागले आहेत.



असे आहे हे शेततळे : शेतात कष्ट करून देखील हवे तसं पीक येत नव्हतं, अशा विवंचनेत असणाऱ्या येवले यांनी शेतात शेततळे केले तर पावसाचे पाणी शेतात साचेल आणि त्याचा उपयोग शेतीसाठी होईल असा विचार केला. शेतात असणाऱ्या उताराच्या भागावर पावसाचे पाणी जमा होत असल्याचं लक्षात आल्यावर, मनरेगाचे तांत्रिक अधिकारी विलास कळमाटे यांनी त्यांना शेतात अस्तरीकरण शेततळे करण्याचा सल्ला दिला. मनरेगा अंतर्गत लाभार्थी योजनेअंतर्गत वीस बाय पन्नास मीटरचे साडेचार मीटरपर्यंत तळे खोदण्यात आले आहे. खोदकामासाठी शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान मिळालं. तसेच या शेततळ्यासाठी खास सहा मायक्रोनची प्लास्टिकची ताडपत्री ही गुजरातच्या अहमदाबाद शहरातून दीड लाख रुपयात आणली. या तळ्यात केवळ पावसाचेच पाणी साचते. यावर्षी मे महिन्यात या शेततळ्याचं काम करण्यात आलं आहे. जून महिन्यात पडलेला पावसाचे पाणी या तळ्यात आता 21 लाख लिटर पाणी साचले आहे.




शेततळे बांधल्यावर आली हिम्मत : पाणी नसल्यामुळं शेती विकून द्यावी असा विचार देखील आला होता. मात्र मनरेगा अंतर्गत शेततळे बांधून मिळतात अशी माहिती मिळाल्यावर शेततळ्याबाबत विचार केला. मनरेगाच्या अधिकारांच्या सल्ल्यामुळे अस्तरीकरणाचे शेततळे बांधण्याचा निर्णय घेतला. यावर्षी पहिल्यांदा शेतातच मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळं गहू, हरभरा असे पीक घेता आले. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न देखील शेतात घेऊ शकतो असा विश्वास आता निर्माण झाला आहे. या शेततळ्याच्या माध्यमातून मासोळीचे उत्पादन देखील घेत आहे. यामुळं शेतीसोबतच पूरक व्यवसाय देखील मिळाल्याचा आनंद उत्तमराव येवले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला.



अस्तरीकरण शेततळ्यांचा शेतकऱ्यांना होणार लाभ : सातपुडा पर्वत रांगेत घनदाट जंगलात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी (Melghat Tribal) आणि गवळी समाजाचा शेती हा महत्त्वाचा उद्योग आहे. मुसळधार पाऊस कोसळत असला तरी 75 टक्के पाणी मेळघाटातून खाली वाहून जाते. तसेच शेतीसाठी उपयुक्त असणारी सुपीक माती देखील वाहून जात असल्यामुळं या भागात शेती करणे फार कठीण झालं आहे. आता मोथा येथे उत्तमराव येवले यांच्या शेतात तयार करण्यात आलेल्या अस्तरीकरण शेततळ्याप्रमाणे चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांनी असे शेततळे बांधले आहेत. आता शेतकऱ्यांना रब्बी पिकं घेता येतील, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल सोबतच मत्स्यपालन देखील होईल. विशेष म्हणजे या भागातील पाण्याची अतिशय गंभीर समस्या देखील मिटेल असं मनरेगाचे तांत्रिक अधिकारी विलास कळमाटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं आहे.

हेही वाचा -

  1. Melghat Bird Survey: मेळघाटात पहिल्या पक्षी सर्वेक्षणात नव्याने १० प्रजातींची भर; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
  2. दिवाळीच्या सुट्ट्या आणि गुलाबी थंडीची मजा; मेळघाटात पर्यटकांची गर्दी
  3. Meditation Center In Melghat : मेळघाटात ध्यान साधना; बारा वर्षात आठ हजार धम्मचाऱ्यांनी घेतलं प्रशिक्षण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.