ETV Bharat / state

फडणवीसांसह घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट, गिरीश महाजनांचे अण्णा हजारेंना आश्वासन

author img

By

Published : Dec 24, 2020, 6:54 PM IST

Updated : Dec 24, 2020, 10:24 PM IST

भेटीवेळचे छायाचित्र
भेटीवेळचे छायाचित्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची गुरुवारी (दि. 24 डिसें.) आमदार गिरीष महाजन यांनी भेट घेऊन चर्चा केली.

अहमदनगर - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे सोमवारी (दि.21 डिसें.) भेट घेतली होती. तर गुरुवारी (दि. 24 डिसें.) भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले आमदार गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धीत हजारे यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली.

भेटीवेळचे दृश्य
फडणवीस यांच्यासह घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट

अण्णा हजारे यांच्या मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वतः केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन चर्चा करणार असून, हा प्रश्नी लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषीमंत्री यांच्याशी आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा करतो, आम्हाला थोडा वेळ द्या, अशी विनंती त्यांनी हजारे यांच्याशी केली होती. महाजन यांनी हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध मागण्या, पत्रव्यवहार व उपोषणानंतर दिलेले लेखी आश्वासन यावर त्यांच्याशी चर्चा झाली.

अण्णांनी दिला आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सन 2018 व 2019 मध्ये उपोषण केल्यानंतर पंतप्रधान कार्यालय व तत्कालिन केंद्रिय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी लेखी आश्वासन देऊनही त्याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. यामुळे हजारे यांनी पुन्हा उपोषण आंदोलनाचा, इशारा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांना पत्र पाठवून दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोमवारी विधानसभेचे माजी सभापती बागडे व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांनी भेट घेऊन हजारे यांच्याशी चर्चा केली होती.

नव्या कृषी कायद्यात अण्णांच्या मागण्या मान्य

अण्णांच्या काही मागण्यांचा समावेश नवीन कृषी कायद्यात केला आहे. शेतीमालाला दीडपट किमान हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षातील शेतमालाचे भाव पाहता मागील दोन-तीन वर्षांत शेतमालाला चांगले भाव मिळत आहे. कपाशीला 5 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळत आहे. तूर, बाजरी, धान यांचेही भाव टप्प्याने वाढत आहेत, असे महाजन म्हणाले.

देशात कायद्याचे स्वागतच - महाजन

पंजाब, हरिणायासारख्या एक दोन राज्यातून या केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध होत असला, तरी देशभरात या कायद्यांचे स्वागत झाले आहे. मोदी सरकार शेतकरी हिताचे आहे. शेतकरी टिकला पाहिजे, वाचला पाहिजे, याच भूमिकेतून मोदी सरकारने क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. नवीन कृषीकायदे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे आहेत. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ देणारे आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्य आहे, ते करण्यात मोदी कुठेही मागे नाहीत, असे माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगतले.

हेही वाचा - नोकरीला लावतो सांगून लाखोंची फसवणूक; राहाता पोलिसांनी केला गुन्हा दाखल

हेही वाचा - शेवगावात किसान संघर्ष यात्रेचे आयोजन, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

Last Updated :Dec 24, 2020, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.