ETV Bharat / state

Balasaheb Thorat on Drought : सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही; बाळासाहेब थोरातांची राज्य सरकारवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 1:29 PM IST

Balasaheb Thorat on Drought : शिर्डी येथे संगमनेर तालुक्यातील 171 गावांमधील सरपंचांसह पदाधिकाऱ्यांची विविध प्रश्नांवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी सरपंचांनी आपल्या समस्यांचा पाढाच थोरातांसमोर वाचून दाखवला. यानंतर सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नसल्याची टीका थोरातांनी केलीय.

Balasaheb Thorat on Drought
Balasaheb Thorat on Drought

शिर्डी Balasaheb Thorat on Drought : राज्य सरकारकडून फक्त मोठमोठ्या जाहिराती करुन घोषणा होत आहेत. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. दुष्काळाचं मोठं संकट असताना जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, प्रशासनाचा मनमानी कारभार, वीज बिलावर व्याज आकारणी अशा विविध प्रश्नांबाबत संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरातांकडे सरकारविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. यावर हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टिका माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांनी केलीय. शिर्डीतील ( Balasaheb Thorat Meeting in Shirdi ) यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनात टंचाई आढावा बैठकीत संगमनेर तालुक्यातील 171 गावांमधील सरपंचांसह विविध पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले.



सरपंचांनी मांडल्या व्यथा : यावेळी सरपंच व्यथा मांडताना म्हणाले की, राज्यासह तालुक्यात दुष्काळाचं मोठं संकट उभं आहे. मात्र, मंत्री व राज्य सरकारला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. याकरता सरकारनं चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. पाणीपुरवठा योजना तसंच घरगुती वीज बिलांवर सावकारी पद्धतीने 18 टक्के व्याज आकारणी केली जाते. मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचं अनुदान अद्यापही मिळालेलं नाही. कांदा अनुदानाचेही अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. यावर्षी खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. सरकारी यंत्रणा मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्या मागेपुढे करण्यात व्यग्र आहे. या प्रशासनाला आणि सरकारला गोरगरीब जनतेचे दुःख कळत नाही. संगमनेर तालुक्यात फक्त पालकमंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवर काम होत असून अनेकांना शासकीय लाभांपासून वंचित ठेवले जात आहे, अशा शब्दांत संगमनेर तालुक्यातील ( Sarpanch in Sangamner Taluka ) शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा बाळासाहेब थोरातांसमोर मांडल्या.

सरपंचांनी दिला मोर्चा काढण्याचा इशारा : आमदार बाळासाहेब थोरातांनी पाठपुराव्यातून मिळवलेल्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती दिली आहे. जेथे काम सुरू होत आहे, तेथे जाऊन पालकमंत्र्यांची खबरे अडवणूक करत आहेत. तालुक्यातील गावांमध्ये अनेक कामे खोळंबली आहेत. गोरगरिबांच्या घरकुलाला वाळू मिळत नाही. मात्र खबऱ्यांच्या सूचनेनुसार रात्रंदिवस मुरूम व वाळूचा उपसा जोरात सुरू असून यावर स्थानिक प्रशासन गप्प आहे. हे असंच सुरू राहिलं तर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढावा लागेल, असा इशारा बाळासाहेब थोरातांसमोर सरपंचांनी दिलाय.


राज्यघटना व लोकशाहीला धोका : सरपंचांच्या तक्रारींवर बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सरकार हे जनतेचे पालक असते. दुष्काळाच्या प्रश्नात सरकारनं जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आपण अनेक वर्ष महसूल, कृषी रोजगार हमी यांसह महत्त्वाचे विभाग सांभाळले आहेत. दुष्काळी काळात राज्यातील सर्व जनतेला मदत केलीय. दररोज रात्री टँकरच्या खेपांचा आढावा घेऊन वाडी वस्तीवर पाणी पोहोचवण्यासाठी काम केलंय. निळवंडे धरण हे 182 दुष्काळी गावांसाठी निर्माण केले असून, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केलीय. तसंच उजवा कालवाही तातडीने पूर्ण करून त्यातूनही पाणी सोडावे व दुष्काळात जनतेला मदत करावी अशी मागणी असल्याचं थोरात म्हणाले. अशा संकटात काम करायचे असते. मात्र, सध्याचं प्रशासन ठप्प आहे. राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. राज्यघटना व लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. जनतेच्या मनात केंद्र व राज्य सरकारबद्दल प्रचंड रोष असून फक्त जाहिरातबाजी करणे हेच या सरकारचे काम असल्याची टीका यावेळी थोरातांनी केलीय.


पशुधनासाठी चारा व्यवस्थाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्यात व तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झालाय. संगमनेर तालुक्यात पशुधन मोठे असल्याने पशुधन वाचवण्यासाठी पाणी व चाऱ्याची आवश्यकता आहे. सरकारने याबाबत कोणतीही तरतूद केली नसून आपण पशुधनासाठी चारा व पाणी मिळण्याकरता तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करणार असल्याचेही माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांनी यावेळी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Balasaheb Thorat On India : 'इंडिया'चा भाजपानं घेतला धसका, सत्ता जाण्याच्या भीतीनं भाजपाचं कारस्थान- थोरात
  2. Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात विरोधकांची आक्रमक भूमीका
  3. Balasaheb Thorat On Savitribai Phule : सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांबाबत सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.