ETV Bharat / sports

India vs Nepal Asia Cup २०२३ : 'टीम इंडिया'ला सुपर ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी आज विजय आवश्यक, पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 7:36 AM IST

India vs Nepal Asia cup
भारत विरुद्ध नेपाळ

India vs Nepal Asia cup २०२३ : आशिया चषकात आज (सोमवार, ४ सप्टेंबर) भारत आणि नेपाळ यांच्यात लढत होणार आहे. स्पर्धेच्या सुपर ४ टप्प्यात पोहोचण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल? जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

पल्लेकल्ले (श्रीलंका) : India vs Nepal Asia cup २०२३ : पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर, आशिया चषकात सोमवारी भारताचा सामना नेपाळशी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून दुबळ्या नेपाळवर मोठा विजय अपेक्षित आहे. या विजयानंतर भारताचं सुपर फोरमध्ये स्थान निश्चित होईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.

पाकिस्तान आधीच सुपर फोरमध्ये पोहचला आहे : पाकिस्ताननं 'अ' गटातून आधीच सुपर फोरमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांचे दोन सामन्यांत तीन गुण आहेत. पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताला एक गुण मिळाला. जर सोमवारचा सामनाही पावसामुळे वाहून गेला, तर भारत दोन गुणांसह सुपर फोरमध्ये पोहोचेल. मात्र रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांना अशाप्रकारे नक्कीच पुढं जायचं नाही.

पाकिस्तानविरुद्ध भारताचा टॉप ऑर्डर फेल : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी काही सकारात्मक बाबी होत्या. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी सुरुवातील टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची भंबेरी उडवली. एकवेळ भारताची धावसंख्या चार विकेटच्या मोबदल्यात ६६ अशी होती. मात्र त्यानंतर, वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इशान किशन आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या २६६ वर नेली.

इशान किशनची चांगली फलंदाजी : वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर किशनने एका बाजूनं उत्तम डाव सांभाळला. किशन पाचव्या क्रमांकावर खेळू शकेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र परिस्थितीनुसार बचावात्मक आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून तो मधल्या फळीतही यशस्वी होऊ शकतो हे किशननं दाखवून दिलं. तसेच हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीमुळेही संघ व्यवस्थापन खूश असेल. त्याने प्रथम किशनच्या साथीदाराची भूमिका अतिशय चोख बजावली. नंतर त्यानं आक्रमक फलंदाजी केली.

नेपाळविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याची संधी : भारताचे अव्वल चार फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:ला जुळवून घ्यावं, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल. रोहित आणि कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. तर अय्यर दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे. या तिन्ही फलंदाजांना नेपाळविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असेल.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे : भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).

नेपाळ - रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतित जीसी, मौसम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद.

हेही वाचा :

  1. IND vs PAK Asia Cup 2023 : आफ्रिदी-रौफ जोडीसमोर टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फ्लॉप
  2. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामना, पावसामुळे फिरले पाणी, भारताचा डाव संपल्यावर सामना रद्द
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.