ETV Bharat / sports

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्व 'विश्वविजेते' कर्णधार राहणार उपस्थित; 'शेजारी' मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 11:43 AM IST

Cricket World Cup Final
Cricket World Cup Final

Cricket World Cup Final : 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी आयसीसीनं माजी विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आमंत्रित केलंय.

अहमदाबाद Cricket World Cup Final : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना अविस्मरणीय बनवण्यासाठी आयसीसीनं एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात यापूर्वीच्या सर्व विश्वविजेत्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. हा सामना पाहण्यासाठी आयसीसीनं 1975 ते 2019 या कालावधीतील विश्वविजेत्या संघांच्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. या सर्व कर्णधारांना खास ब्लेझरही देण्यात येणार आहे. सामना पाहताना हे सर्व कर्णधार ब्लेझर घालून बसतील.

भारतीय संघ बनला पहिल्यांदा विश्वविजेता : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या पहिले तीन हंगाम 50 षटकांचे नसून 60 षटकांचे झाले होते. वेस्ट इंडिजनं क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली 1975 आणि 1979 मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकले. त्यानंतर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं 1983 च्या विश्वचषकात इतिहास रचला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं केवळ 183 धावा केल्या. परंतु भारतीय संघानं शानदार गोलंदाजी करत दोन वेळच्या विश्वविजेत्यांचा डाव अवघ्या 140 धावांवर रोखला.

इम्रान खान यांचं येणं अशक्य : 1987 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 254 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 246 धावाच करु शकला. अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं प्रथमच विश्वचषक जिंकला. 1992 मध्ये पाचवा विश्वचषक झाला. यात प्रथमच पाकिस्ताननं कर्णधार इम्रान खानच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकला. अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. मात्र इम्रान खान हे तुरुंगात असल्यानं त्यांचं येणं अशक्य आहे.

ऑस्ट्रेलियाची विश्वविजयाची हॅट्रीक : श्रीलंकेनं अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वाखाली 1996 मध्ये विश्वचषक जिंकला, पण अर्जुना रणतुंगासाठी भारतात येणं कठीण आहे. रणतुंगानं अनेकवेळा भारतीय क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर 1999 मध्ये ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. नंतरच्या विश्वचषकात रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2003 आणि 2007 मध्ये विश्वचषक जिंकला होता.

28 वर्षांनी भारत पुन्हा विश्वविजेता : त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2011 मध्ये 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला होता. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2015 मध्ये पाचव्यांदा विश्वचषक जिंकला होता. 2019 ची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडनं जिंकली. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं.

हेही वाचा :

  1. महामुकाबल्यासाठी भारतीय रेल्वेही सज्ज! अहमदाबादसाठी धावणार तीन 'वर्ल्डकप स्पेशल' ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
  2. ऑस्ट्रेलियाच नॉकआऊट सामन्यांचा 'दादा'! कांगारूंमुळे अनेकदा मोडलं भारताचं विश्वचषकाचं स्वप्न
  3. कोणाला मिळणार 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार, 'हे' आहेत प्रमुख दावेदार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.