ETV Bharat / international

India slams Pak: संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला काश्मीरचा मुद्दा.. भारताने पाकिस्तानला फटकारले

author img

By

Published : Mar 8, 2023, 6:27 PM IST

India slams Pak foriegn minister Bilawal for raking up Kashmir at UNSC debate
संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला काश्मीरचा मुद्दा.. भारताने पाकिस्तानला फटकारले

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने काश्मीर मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याबद्दल पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या काश्मीरवरील भाषणावर संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी रुचिका कंबोज यांनी भुट्टो यांचं भाषण हे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

युनायटेड नेशन्स: महिला, शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावरून आता भारताने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. भारताने म्हटले की, अशा दुर्भावनापूर्ण प्रचाराला उत्तर देणे देखील अनपेक्षित आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीर मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मंगळवारी भुट्टो यांचे विधान निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा: यावेळी कंबोज म्हणाल्या की, 'माझे भाषण संपण्यापूर्वी मी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाबाबत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेले स्वस्त, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित वक्तव्य आम्ही नाकारतो.' युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये 'महिला, शांतता आणि सुरक्षा' या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान कंबोज म्हणाल्या, 'माझ्या शिष्टमंडळाला असे वाटते की, अशा दुर्भावनापूर्ण आणि खोट्या प्रचाराला उत्तर देणे योग्य नाही. उलट आपला फोकस हा सकारात्मक आणि पुढचा विचार करणारा असावा. आजची चर्चा महिला, शांतता आणि सुरक्षा हा अजेंडा पूर्णत: अंमलात आणण्यासाठी आमच्या सामूहिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही चर्चेच्या विषयाचा आदर करतो आणि वेळेचे महत्त्व ओळखतो, असेही कंबोज म्हणाल्या.

दरवेळी काश्मीरचे तुणतुणे: विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मोझांबिकच्या राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी या महिन्यात जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर कंबोज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तान दरवेळी काश्मीरच्या प्रश्नावर मुद्दा उपस्थित करत असतो. काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचे माहित असूनही पाकिस्तानकडून दरवेळी काही ना काही कुरापती करण्याचे काम नेहमीच सुरु असते. भारताकडूनही पाकिस्तानच्या या प्रचाराला तोडीस तोड उत्तर देण्यात येत असते. त्यानुसार आज भुट्टो यांचं भाषण झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला झापले आहे.

हेही वाचा: पत्त्याप्रमाणे कोसळली पाच मजली इमारत, होत्याच नव्हतं झालं, पहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.