दुशांबे : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी अफगाणचे राष्ट्राध्यक्ष घानी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेबाबत चर्चा केली. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये ही भेट पार पडली. जयशंकर सध्या ९व्या हार्ट ऑफ आशिया-इस्तांबुल प्रोसेस या परिषदेसाठी ताजिकिस्तानमध्ये आहेत.
घानी यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली. मागील आठवड्यात जयशंकर म्हणाले होते, की एक लोकशाही, सर्वसमावेशक आणि अल्पसंख्यांकांच्या हिताबाबत दक्ष असलेला अफगाणिस्तान पाहायला भारताला आवडेल. सध्या तालिबान आणि अफगाण सरकारमध्ये शांतता चर्चा सुरू आहे, याबाबत सगळीकडे बोलले जात आहे. याचं पुढे काय होतं ते आपण पाहूयात, असेही जयशंकर म्हणाले होते.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या १९ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी तालिबान आणि सरकारमध्ये शांतता चर्चा सुरू आहेत. या युद्धांमध्ये आतापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला असून, हजारो लोक विस्थापित झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करत असलेल्या देशांमध्ये भारताचाही मोठा वाटा आहे. देशाने यासाठी दोन बिलियन डॉलर्सची गुंतवणूकही केली आहे.
हेही वाचा : कोरोनाची दुसरी लाट : पाकिस्तानात काही ठिकाणी लॉकडाऊन लागू