ETV Bharat / entertainment

Javed Akhatar about Ramayan : 'रामायण' ही आपली 'सांस्कृतिक मालमत्ता' असल्याचं जावेद अख्तरांचं रोखठोक मत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 1:27 PM IST

Javed Akhatar about Ramayan : राम आणि सीता हे फक्त हिंदू धर्मियांचे नाहीत, तर ते या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे, असं स्पष्ट मत गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलंय. 'मनसे'तर्फे शिवाजी पार्क येथे केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Javed Akhatar about Ramayan
गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर

मुंबई - Javed Akhatar about Ramayan : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला माझ्यासारखी नास्तिक व्यक्ती कशी? असा प्रश्न अनेकांना पडला असंल तर राम आणि सीता हे फक्त हिंदू धर्मियांचे नाहीत, तर ते या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे, असं रोखठोक मत प्रसिद्ध गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी मांडलाय.

Javed Akhatar about Ramayan
दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जावेद अख्तर व सलीम खान



स्वतःला नास्तिक समजणारे जावेद अख्तर - 'मनसे'तर्फे दरवर्षी शिवाजी पार्क येथे दिवाळी निमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे ११ वे वर्ष असून या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसिद्ध गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर व सलीम खान यांना आमंत्रित केलं होतं. पाकिस्तानात जाऊन आपल्या भूमीचा मान राखणारे व पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांची प्रशंसा राज ठाकरे यांनी दिलखुलासपणे एका जाहीर सभेत केली होती. दीपोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेल्या जावेद अख्तर यांनी याप्रसंगी बोलताना म्हटले की, "या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. सलीम - जावेद शिवाय राज ठाकरे यांना दुसरे कोणी भेटलं नाही का? असा प्रश्नही अनेकांना पडला असंल. तसंच स्वतःला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे काय? असंही अनेक जणांना वाटलं असंल. पण राज ठाकरे हे आमचे परममित्र असून त्यांनी शत्रूला सुद्धा आमंत्रण दिले तर तो नकार देणार नाही. अशामध्ये आम्ही तर मित्र आहोत", असं जावेद अख्तर यांनी सांगितलं. याप्रसंगी फिल्म अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सलीम जावेद यांची मुलाखत घेतली व या मुलाखतीला सुद्धा सलीम - जावेद यांनी भन्नाट उत्तरं दिली.

Javed Akhatar about Ramayan
जावेद अख्तर व सलीम खान यांची मुलाखत घेताना रितेश देशमुख



रामायण ही देशातील प्रत्येक व्यक्तीची संपत्ती - 'शोले' चित्रपटातील शंकराच्या मंदिरातील एका सीन बद्दल बोलताना देखील जावेद अख्तर यांनी सांगितलं की, 'शोले'मधील तो सीन मी किंवा सलीमजी आताच्या प्रसंगी लिहू शकत नाही. कारण सध्या मंदिराबाबत आपण सर्व इतके भावनिक झालो आहोत की कोणत्याही गोष्टीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे 'संजोग' चित्रपटातील कृष्ण सुदामाचं संपूर्ण आयुष्य ओम प्रकाश यांनी तेव्हा चित्रपटातील गाण्यांमधून दाखवलं होतं. पण ते आता आपण करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचही मनापासून कौतुक केलंय. हिंदूंचं मन हे विशाल असल्याकारणानं ही संस्कृती सुद्धा तितकीच समृद्ध आहे, असे ते म्हणाले. तसंच, माझा जन्म श्री राम आणि सीता यांच्या देशात झाला असून मी राम आणि सीता यांना फक्त हिंदूंचा वारसा समजत नाही तर या देशातील प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे. राम व सीता हे या देशातील एकूण एक नागरिकांचे दैवत आहेत. तसेच रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता असल्याचंही जावेद अख्तर यांनी सांगितलंय.

Javed Akhatar about Ramayan
दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जावेद अख्तर व सलीम खान


त्या लेखकांचं काम नेहमी उत्तम होतं - याप्रसंगी बोलताना सलीम खान यांनी आजच्या लेखनाबद्दल परखड मतं व्यक्त केलंय. ते म्हणाले की, आजकाल लोकांना पटकन प्रसिद्धी हवी आहे. त्यासाठी वाईट किंवा द्विअर्थी असं लेखन केलं जातं. परंतु शाश्वत लेखन मूल्याची जपवणूक करण्याचं भान लेखकानं कधीही सोडता कामा नये. तसंच जे चांगलं आहे त्याला चांगल म्हणणे व जे वाईट आहे त्याला वाईट म्हणणे याबाबत ज्यांचे एकमत असतं, त्यांचं काम नेहमी उत्तम होतं, असेही सलीम खान म्हणाले आहेत.



भारतात जावेद अख्तर सारखा मुसलमान हवा - यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकिस्तानातील लाहोरमध्ये झालेल्या 'फैज फेस्टिवल २०२३' मध्ये बोलताना जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत त्यांच्यावर कडक शब्द टीका केली होती. त्यांचा तेव्हाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. जावेद अख्तर यांनी घेतलेल्या या भूमिकेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च महिन्यात घेतलेल्या जाहीर सभेत उल्लेख करून त्यांची मोठी प्रशंसा केली होती. मला भारतीय मुसलमान मुसलमान हवा आहे, परंतु तो जावेद अख्तर सारखा हवा आहे, असे ते म्हणाले होते. आता दीपोत्सवाच्या निमित्ताने जावेद अख्तर व राज ठाकरे यांच्यामधील मैत्रीही पुन्हा अधिक घट्ट झाली आहे.

हेही वाचा -

  1. Bigg Boss 17 Day 26 Highlights: अंकिता लोखंडेनं मन्नारा, मुनावरला 'पॉवर की रेस'मधून बाहेर काढले, नामांकनातून सुटली जिग्ना व्होरा

2. Sunny Leone Missing Girl : बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनीनं केलं होतं आवाहन, 24 तासात लागला मुलीचा शोध

3. Parineeti Chopra Maldives Vacation : परिणीती चोप्रानं मालदीवमधील थ्रोबॅक फोटो केले शेअर; पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.