ठाणे - तलावांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेले ठाणे खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकारी व कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले. गेले अनेक दिवस ठाण्यातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. याचा फटका सर्व नागरिकांना होत आहे.
ठाण्याहून भिवंडी व नाशिककडे जाणारे महामार्ग यावर प्रवास करणार्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शुक्रवारी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व भागाचा आणि वाहतूक समस्येचा आढावा घेतला. आणि उपाययोजनेसाठी आदेशही दिले.
रस्त्यांची केली पाहणी
या दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा, एमएमआरडीए, एम एसआरडीसी, मुंबई मेट्रो अशा काम करणाऱ्या एजन्सीच्या अधिकारी व कंत्राटदारांना चांगलेच फैलावर घेतले. ठाण्यातील आनंदनगर टोल नाकायेथून भिवंडी पडघा इथपर्यंत रस्त्यांची पाहणी केली. आणि वाहतूक कोंडी का होते, खड्डे कुठे पडले आहेत, मेट्रोच्या कामांमुळे किती अडथळा निर्माण होतो आहे व अवजड वाहनांची दिवस वाहतूक किती त्रासदायक होत आहे या सर्व बाबींची माहिती घेतली.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश
निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करा. व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. संबंधित अधिकारी व कंत्राटदार ठोस काम करत नसल्याने लोकांचा संताप आम्हाला सहन करावा लागतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खड्डे मी बुजवायचे का व कामाचा दर्जा मी चेक करायचा का असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
डोंबिवलीची घटना काळिमा फासणारी
डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची निंदा करत ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे असे सांगितले. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जाणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दोषी कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच हा शब्द देखील पालकमंत्र्यांनी दिला.
हेही वाचा - UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण