ETV Bharat / city

कसारा घाटात देवदूतांनी वाचवले १५७ लोकांचे प्राण

author img

By

Published : Aug 9, 2021, 8:38 AM IST

Angels save 157 lives in Kasara Ghat
कसारा घाटात देवदूतांनी वाचवले १५७ लोकांचे प्राण

कसारा घाटात प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातानंतर योग्यवेळी सहकार्य न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. त्यामुळे अपघात होताच लोकांना तात्काळ उपचार व मदत मिळावी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन इगतपुरी, कसारा, खर्डी, शहापूर, वासिंद आणि पडघा येथील २० ते ४० वयोगटातील 220 तरूणांनी एकत्र येत आपत्ती व्यवस्थापन टीम बनवली आहे.

ठाणे - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या कसारा घाटात देवदूतासारखी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन टीमने आतापर्यंत १५७ लोकांचे विविध अपघातातून प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे या टीमने आपत्तीवेळी मदत करण्यासाठी लागणारे साहित्य स्वखर्चाने विकत घेऊन लोकांचे प्राण वाचवत मदतकार्याला सुरुवात केली.

कसारा घाटात देवदूतांनी वाचवले १५७ लोकांचे प्राण

अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावा म्हणून... -

कसारा घाटात प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातानंतर योग्यवेळी सहकार्य न मिळल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. त्यामुळे अपघात होताच लोकांना तात्काळ उपचार व मदत मिळावी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन इगतपुरी, कसारा, खर्डी, शहापूर, वासिंद आणि पडघा येथील २० ते ४० वयोगटातील तरूणांनी एकत्र येत आपत्ती व्यवस्थापन टीम बनवली आहे. याटीमच्या माध्यमातून हे युवक 2017 पासून कसारा घाटात अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी देवदूताचे कार्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १५७ जणांचे विविध अपघातात प्राण वाचवले आहेत.

ट्रकचा दरवाजा तोडून वाचवले दोघांचे प्राण -

गेल्याच आठवड्यात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रकच्या खाली अडकला होता. त्यातच मदतीसाठी तज्ञ नसल्यामुळे इतर लोक असह्यपणे बघत होते. मात्र, टीमला अपघाताची माहिती मिळताच घटनस्थळी पोहचून दरीत उतरलो. त्यांनतर आम्ही चौघांनी ट्रकचा दरवाजा तोडून दोघांचा जीव वाचल्याचे यश आले. टीमचे प्रमुख श्याम धुमाळ यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना माहिती दिली.

सुरुवातीला टीममध्ये केवळ २० सदस्य -

चार वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये सुरुवातीला कसारा येथील २० सदस्य टीममध्ये सामील झाले. मात्र, त्यानंतर जवळच्या गावातील या टीमचे काम पाहून गावकऱ्यांनी साथ देत, या टीमची सदस्यांची संख्या आता २२० पर्यंत पोहचली आहे. सुरुवातीला या टीमकडे मदतकार्यात लागणारे उपकरणे नव्हती. अशातही वाहनाला आग विझवण्यास, अपघात झालेल्या कारमध्ये अडकलेल्या लोकांना काढून त्यांना रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. त्यांनतर मात्र लाईफ जॅकेटसह दरीत पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही ३५० फुटांची दोरखंडसह पाण्यातुन जाण्यासाठी बोट विकत घेतली. टीममध्ये चांगले गोताखोर, जलतरणपटू आणि साहसी खेळांचे थोडे ज्ञान असलेले सदस्य आहेत. शिवाय एकमेकांना बचावकार्याचे प्रशिक्षण देऊन पैशांचेही योगदान देत असल्याचे सांगण्यात आले.

घाटातील शॉर्टकटची माहिती -

टीममधील सर्वजण लहानपणापासून कसारा घाट परिसरात राहणारे असल्याने अपघातस्थळी पोहोचण्यासाठी बहुतेक शॉर्टकट रस्ते माहित असतात. शिवाय पोलीस अधिकारी, महामार्ग अधिकारी, तहसीलदार, अग्निशमन दल, जवळच्या रुग्णालयांचे डॉक्टर, रेशनिंग दुकान मालक आणि गॅरेज मालक ओळखीचे असल्याने मदतकार्यासाठी त्यांचीही मदत घेतात. त्यामुळे अहोरात्र आमची टीम मदतकार्यासाठी कार्यरत असल्याचे श्याम धुमाळ यांनी सांगितले.

टीममध्ये विविध गावांमधील २२० हून अधिक गावकऱ्यांचा समावेश -

कसारा परिसरातील विविध गावांमधील २२० हून अधिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन कसारा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या माध्यमातून अपघातग्रस्त लोकांचे जास्तीत प्राण वाचावे, या उद्देशाने ही टीम स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या टीममधील सदस्य वेगवेगळ्या नोकऱ्या व व्यवसाय सांभाळून मदतकार्यात सहभागी होत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी कसारा घाटावर १०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या अपघातांमध्ये सुमारे १५७ अपघातात गंभीर जखमी असलेल्या लोकांना वाचवले. कसारा घाटात चढण–उतार तसेच खोल दरी आहे. शिवाय, आपत्ती टीमच्या सदस्यांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी रॅपेलिंग आणि रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण घेतले असून एखादी घटना घडताच आपत्ती स्थळाच्या जवळ राहणारे टीमचे सदस्य सर्वात प्रथम मदतीसाठी घटनस्थळी पोहोचतात, असे धुमाळ यांनी सांगितले.

तहसीलदारांकडून टीमचे तोंडभरून कौतुक -

शहापूर तालुक्याच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या प्रयत्नांचे कौतुक करत म्हटले की, तालुक्याच्या ठिकाणी शासनाची अधिकृत आपत्ती व्यवस्थापन टीम आहे. मात्र, या शासनाच्या टीमकडे मदतकार्यासाठी लागणारे सर्व उपकरणे नाहीत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कल्याण किंवा भिवंडी या जवळच्या महापालिकांमधून मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीम बोलावली जाते. मात्र, कल्याण, भिवंडीपासून कसारा ६० किलोमीटर अंतर असल्याने ते उशिरा घटनास्थळी पोहचतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आपत्ती आल्यास कसारा आपत्ती टीममधील गावकरीच सर्वांत प्रथम घटनस्थळी पोहोचुन मदत करतात. शिवाय, ही टीम अपघात, भूस्खलन, पूर, बुडणे किंवा रेल्वे अपघातांमध्ये मदत करतात. विशेष म्हणजे श्याम धुमाळ यांची टीम सर्वात प्रथम घटनास्थळी पोहचण्यासाठी सर्व टीमचे सदस्य व्हॉटस् अॅप ग्रृपच्या माध्यमातून एकमेकांशी चांगले जोडलेले आहेत. या टीमने जीवाची बाजी लावून आतापर्यत अनेक लोकांचे जीव वाचवण्यात मदत केल्याची माहिती तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले.

अपघातग्रस्ताला मदत करताना एक पैसाही आकारत नाहीत -

शहापूरचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी माहिती दिली की, घाटात पाच वर्षात सुमारे ४५० अपघात झाले आहेत. अपघात होताच आपत्ती टीमच्या सदस्यांना आम्ही त्यांना ताबडतोब फोन करून घटनेची माहिती देतो. माहिती मिळताच टीमचे सदस्य घटनस्थळी दाखल होऊन अपघातांमध्ये अडकलेल्यांना बाहेरकडून उपचारासाठी वेळेत पोहोचवतात. शिवाय या टीममधील सदस्य खोल दरीत उतरतात, तसेच मदतकार्य करताना त्यांच्या स्वतःच्या सर्व उपकरणांसह अडकलेल्या नागरिकांना मदतकार्य देतात. या टीमने सामाजिक बांधिलकी राखत लॉकडाऊन काळातही घाटातून पायी जाणाऱ्या लोकांना जेवणाची सोय केली होती. विशेष म्हणजे भूस्खलन स्थळाच्या ठिकाणी मदतकार्य आणि कोणत्याही अपघातग्रस्ताला मदत करताना एक पैसाही आकारत नाहीत. या टीमच्या सर्व सदस्यांचा एकच ध्यास आहे. तो म्हणजे जास्तीत जास्त मदतकार्य करून लोकांचे जीव वाचवणे असे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.

हेही वाचा - VIDEO : रुग्णालयात अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदारास महिलांनी अन् मनसे कार्यकर्त्यांनी भररस्त्यात चोपले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.