ETV Bharat / city

सोलापुरात वीज बिल माफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; निवेदन देण्यावरून शेतकरी-पोलीस आमनेसामने

author img

By

Published : Feb 8, 2022, 6:38 PM IST

Updated : Feb 8, 2022, 9:13 PM IST

महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने (Janhit Shetkari Sanghatana Protest) महावितरण कार्यालयात वीज बिल माफीसाठी आंदोलन करण्यात आले. यानंतर निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी फरफटत नेले आहे.

farmers protest
सोलापुरात शेतकऱ्यांचे आंदोलन

सोलापूर - महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने (Janhit Shetkari Sanghatana Protest) महावितरण कार्यालयात वीज बिल माफीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी फरफटत नेले आहे. शेतात काम करण्याचे औजार म्हणजे रुमणं घेऊन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आले होते. पण निवेदन देण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलीस परवानगी नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः फरफटत नेले. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आंदोलन झाले, पण पोलिसांनी शेतकऱ्यांचा एक शब्दही न ऐकता त्यांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलक शेतकरी व पोलीस आमनेसामने

सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात आंदोलन-

लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना उसाची बिल देखील साखर कारखानदार वेळेवर देत नाहीत. शेतकरी भयानक संकटात आहेत. अशा संकटावेळी महावितरण मात्र सक्तीची वीज बिल वसुली करत आहेत. लॉकडाऊन, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल असताना सक्तीची वीज बिल वसुली थांबवा आणि संपूर्ण वीज बिल माफ करा, अशी मागणी करत जनहित शेतकरी संघटनेने हातात रुमणं घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

farmers protest
पोलीस-शेतकरी आमनेसामने

महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा -

अजित पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांनी निवडणुकीत वेगवेगळे आश्वासने देत सत्तेवर येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या नेत्यांनी शेतकऱ्यांची वीज बिलं शंभर टक्के माफ करू असे आश्वासन दिले होते. निवडणुकीत दिलेलं शब्द पाळावा अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली आहे.

farmers protest
पोलीस-शेतकरी आमनेसामने

सकाळपासून पोलिसांचा ताटकळत बंदोबस्त-

प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हातात लाकडी शेतकी औजार(रुमणं) घेऊन आंदोलन करत निवेदन देणार असल्याने फौजदार चावडी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. या आंदोलनाला पोलीस परवानगी नाकारण्यात आली होती. दुपारी दोन वाजता आंदोलनाची वेळ निश्चित होती, पण हे आंदोलन संध्याकाळ 5 वाजता सुरू झाले. दिवसभर ताटकळत थांबलेल्या पोलिसांनी शेतकरी आंदोलक छुप्या मार्गाने येताच सर्वांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पोलीस आक्रमक भूमिका घेत सर्व आंदोलक शेतकऱ्यांना फरफटत नेले.

Last Updated :Feb 8, 2022, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.