पुणे - भाजीपाला, फळ, पान, तरकारी, पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यांना पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे न्याय मिळवून देणारा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मंडई येथील व्यवसायिकांवर काही दिवसांपासून अन्याय होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले मंडई येथे भेट देऊन या व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते.
आधी पुनर्वसन करा
मी मेट्रोचा आराखडा पाहिला असून, त्यानुसार मेट्रोने कारवाई करावी, परंतु आधी या व्यवसायिकांचे पुनर्वसन करावे, आणि मगच गाळे खाली करावेत अशी मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली आहे. मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यवसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आहे त्या जागी पुनर्वसन करावे, भाडेवाढ रद्द करावी, गाळे दुरुस्ती करावी, रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्याचं निवेदन यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची, वंचित आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी, नितीन शेलार, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे, राहुल खोपडे, संतोष कुदळे तसेच मंडई येथील व्यवसायिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.