ETV Bharat / city

Narayan Rane Criticizes Shivsena : ब्लॅकने जमीन घेऊन व्हाइटने विकणे म्हणजे शिवसेना, राणेंची टीका

author img

By

Published : Mar 2, 2022, 5:02 PM IST

नारायण राणेंनी नाशिकमध्ये बोलताना शिवसेनेवर हल्ला केला आहे. ब्लॅकने जमीन घेऊन व्हाइटने विकणे म्हणजे शिवसेना. आपली दुकाने चालवण्यासाठी शिवरायांचा नाव घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असे म्हणत शिवसेना तर खरी गद्दार आहे, अशी टीकाही राणेंनी केली ( Narayan Rane Criticizes Shivsena ) आहे.

Narayan Rane
Narayan Rane

नाशिक - तीर्थक्षेत्र ते आयटी क्षेत्र असा नाशिकचा प्रवास होत आहे. नाशिक येथे महापालिकेच्या अख्यत्यारित साकारण्यात येत असलेल्या आयटी पार्कला सर्वोतपरी मदत करण्यास मी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane In Nashik ) यांनी दिली. महापालिकेच्या माध्यमातून आयटी हबची उभारणी करण्यात येत आहे. त्याकार्यक्रम प्रसंगी राणे बोलत होते.

आयटी हब उभारायचे आहे, राजकारण करायचे...

नारायण राणे म्हणाले, एकावेळी एकच काम नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास कार्यात नक्कीच यश मिळते. त्याचा मोठा वस्तुपाठ हा उद्योजकांनी आपल्या कार्यातून देशाला घालून दिला आहे. नाशिक मध्ये आपल्याला आयटी हब उभारायचे आहे, राजकारण करायचे नाही. हे विरोध करण्याऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावे, असा टोला राणेंनी शिवसेनाच्या स्थानिक नेतृत्वाला लगावला आहे. आयटी मधून उद्योग व जीडीपी वाढण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी नाशिकसाठी काय हवे ते हक्काने मागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ब्लॅकने जमिनी घेऊन व्हाइट ने विकणे म्हणजे शिवसेना

नाशिकमध्ये ज्यांना आयटी हब नको त्यांनी आपली भूमिका अभ्यासपूर्ण मांडावी. शिवसेनेने कोकणातील विविध प्रकल्पांना सुरुवातीला विरोध केला. नंतर तेथेच जमिनी खरेदी करुन व्यवहार पांढरा असल्याचे दाखवले. ब्लॅकने जमीन घेऊन व्हाइटने विकणे म्हणजे शिवसेना, असे म्हणत राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला ( Narayan Rane Criticizes Shivsena ) आहे. शिवसेनेत आता विकास, हिंदुत्व यांना मुठमाती दिली जात आहे. नाशिकच्या आयटी पार्कला शिवसेनेचा असलेला विरोध दुर्दैवी आहे. शिवसेनेच्या काळात राज्यात नेमके काय होत आहे, हाच प्रश्न आहे. राज्यात कोणीही सुखी नाही आहे. महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी मी दोनदा राज्य सरकारला पत्र दिले, मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ भांडण कटकट करणे हाच राज्य सरकारचा धर्म असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

शिवसेना खरी गद्दार

विकासाला विरोध करणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. विकासाला जात, पंथ ,पक्ष नसतो हे सेनेला समजलेच नसल्याचे राणे यांनी सांगितले. नितेश राणे यांच्यावरील आरोप हे चुकीचे असल्याचे सांगत राज्य सरकारची खुर्ची हालत आहे. आम्ही शिवरायांना मानतो म्हणून नाव घेतो. आपली दुकाने चालवण्यासाठी शिवरायांचे नाव घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असे म्हणत शिवसेना तर खरी गद्दार आहे. युती केली एका बरोबर आणि स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजेच मुख्यमंत्रिपद पाहिजे म्हणून गेले दुसऱ्याबरोबर ही गद्दारी राज्यातील जनतेला देखील आवडली नाही, असेही राणेंनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Nitesh Rane On Disha Salian : पोलिसांच्या नोटिसीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'दिशाला न्याय मिळावा...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.