नागपूर : RSS Vijayadashami Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ( Rashtriya Swayamsevak Sangh ) दरवर्षी नागपुरात विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात येतो. या उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते कारण विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातूनचं संघ आपली पुढील वाटचाल कशी असेल याचा सूतोवाच जाहीरपणे करतो. विजयादशमी उत्सवात सरसंघचालक स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन देखील करतात. त्यांच्या भाषणाला एका-प्रकारे सिग्नेचर स्पीचची मान्यता आहे. सरसंघचालकांचे भाषणाचा प्रभाव देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात दिसून येतो.
संघटन कौशल्याचे शक्ति प्रदर्शन : सरसंघचालक सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक यासह देशासमोर निर्माण झालेल्या समस्यांवर परखडपणे आपले मत मांडतात. त्याचे दूरगामी परिणाम देशात दिसून येत असल्याने प्रत्येक सामाजिक आणि राजकीय घटकाचे त्यांच्या उद्बोधनाकडे कान लावून असतात. एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सवाच्या ( RSS Vijayadashami celebration ) माध्यमातून संघटन कौशल्याचे शक्ति प्रदर्शन करत असतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ साली केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संघ हा ९७ वर्षांचा झाला आहे. आरएसएस ही एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. देशातील सर्वात मोठे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा उल्लेख होतो. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन देखील केले जाते,हिंदू मान्यतेनुसार शस्त्र पूजनाला फार महत्त्व आहे.
विजयादशमी उत्सव परंपरा : २७ सप्टेंबर १९२५ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापन झाली, तो दिवस विजयादशमीचा होता. आद्य सरसंघचालक हेडगेवार यांनी ही परंपरा सुरू केली होती. गेल्या ९७ वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे.
डॉ.मोहन भागवत सहावे सरसंघचालक :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे होते. मात्र, हिंदू मान्यतेनुसार आकड्यांची सुरुवात ही शून्यपासून होते, ते आद्य सरसंघचालक ठरले. प्रथम सरसंघचालक हे डॉ. परांजपे होते (हेडगेवार कारागृहात असल्याने वर्षभरासाठी त्यांनी कार्यकाळ सांभाळला) द्वितीय गोळवलकर गुरुजी, तृतीय बाळासाहेब देवरस, चतुर्थ राजेंद्र सिंग, पंचम सुदर्शनजी, सहावे आणि सातवे डॉ. मोहन भागवत आहेत.