ETV Bharat / city

नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राचा गृहमंत्र्यांकडून आढावा, दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल असा तपास करा - वळसे पाटील

author img

By

Published : Oct 22, 2021, 10:15 PM IST

Updated : Oct 22, 2021, 10:27 PM IST

Dilip valse patil
Dilip valse patil

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल भ्रम निर्माण करणाऱ्यांना पारदर्शी कारभाराने, व्यापक जनसंपर्काने उत्तर द्या, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय करू नका, असे स्पष्ट निर्देश आज त्यांनी या बैठकीत दिले.

नागपूर - एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल, अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस यंत्रणांना दिले आहेत. नागपूर येथे पोलिस मुख्यालयात नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटली पाहिजे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवण्याची हिंमत कोणी करू नये, महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल भ्रम निर्माण करणाऱ्यांना पारदर्शी कारभाराने, व्यापक जनसंपर्काने उत्तर द्या, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय करू नका, असे स्पष्ट निर्देश आज त्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, दोन्ही परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

आजच्या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी पुढच्या दोन महिन्यात विभागातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासंदर्भातील दृष्टिपथात पडेल असे कार्य पुढे आले पाहिजे, असे स्पष्ट केले. बलात्कार आणि लुटमार या संदर्भातील घटनाक्रम गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संख्या वाढ झाली आहे का ? याचा विचार करण्याची ही योग्य वेळ असून अवैध दारू व व्यसनाधीनता अशा या गुन्ह्यांच्या उगम स्थळांना वेळीच ठेचून काढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यमे यांच्याकडे आपला पारदर्शी कारभार मांडा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवा -

समाजातील माफिया कोणत्याही स्तरातील असतील, दारू माफिया, वाळू माफिया, मोका केसेस लागलेले घटक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींची नोंद ठेवा. या विभागात प्रत्येक जिल्ह्याचा गुन्हेगारी दर घटला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठरवले तर जिल्ह्यामधील गुन्हे कमी होऊ शकतात. ठाणेदाराने ठरवले तर ठाण्याच्या परिसरात गुन्हे घडू शकत नाहीत. मात्र तरीही गुन्हे का घडत आहेत, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

मादक पदार्थांचे सेवन वाढत आहे -

शाळा कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे, ही बाब धोकादायक आहे. नव्या पिढीला विश्वासात घेण्याची गरज आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण होण्यासाठी तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला पुढे आणा, असेही त्यांनी आवाहन यावेळी केले.

नवाब मलिक धमकीप्रकरणी प्रतिक्रिया -

नवाब मलिक यांना धमकी मिळाल्याचं समजतंय, मी नवाब मलिक यांच्याकडून माहिती घेईन, त्यांना धमकी येत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत

मुंबई फेरीवाल्यांचे धाडस -

मुंबईत फेरीवाल्यांची हिम्मत वाढत चालली आहे, यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर शेवटच्या अंमलदारावर जबाबदारी देणे हाच पर्याय आहे, त्या दृष्टीने आम्ही काम करू.

Last Updated :Oct 22, 2021, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.