हवामान खात्याचा इशारा: आजपासून राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

author img

By

Published : Sep 25, 2021, 1:22 PM IST

Updated : Sep 26, 2021, 6:12 AM IST

हवामान खात्याचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसणार असून पावसाचा हा जोर आजपासून ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.

मुंबई - आजपासून पुन्हा मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसणार असून पावसाचा हा जोर आजपासून ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा -

हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे चक्रीवादळाचे रूप घेऊ शकतात. आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करेल. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल. येत्या 4-5 दिवस मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विशेषत: आजपासून पावसाचा जोर वाढेल.

राज्यभरात परिणाम -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये दिसणार आहे. हे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने जाणार आहे. यामुळे आजपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त असेल. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईतही दिसून येईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 19 धरणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 19 धरणांमध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे पुढील वर्षापर्यंत जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटला आहे. नाशिक जिल्ह्यातील लहान मोठ्या 24 धरणांपैकी 19 धरणात 80 टक्के हुन अधिक पाणीसाठा असून यातील 15 धरणे 90 टक्केपेक्षा अधिक भरली आहेत. धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये सात मोठे प्रकल्प तर 17 मध्यम प्रकल्प आहेत. नाशिक शहरात जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने महानगरपालिकेने आठवड्यातून एकदा पाणी कपात केली होती. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के भरले आहे. आठ दिवसापूर्वी गंगापूर धरणातून हजारो क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. हे सर्व पाणी जायकवाडी धरणाला जाऊन मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांत मिळून सद्यस्थितीला एकूण 78 टक्के पाणीसाठा आहे. तर एकूण 51 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

Last Updated :Sep 26, 2021, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.