ETV Bharat / city

महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, भाजप नेते किरीट सोमैय्यांचा संकल्प

author img

By

Published : Sep 20, 2021, 9:54 PM IST

Kirit Somaiya allegation Hassan Mushrif
महाराष्ट्र घोटाळेमुक्त किरीट सोमैय्या प्रतिक्रिया

काल महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमैय्या असे वातावरण तापले होते. अखेर कराडवरून परतलेले सोमैय्या यांचे त्यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा संकल्प सोमैय्या यांनी केला.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची घोटाळ्याची यादी बाहेर काढायला सुरुवात केली. ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर देखील आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप सोमैय्या यांनी केले. यानंतर काल महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमैय्या असे वातावरण तापले होते. अखेर कराडवरून परतलेले सोमैय्या यांचे त्यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा संकल्प सोमैय्या यांनी केला.

माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैय्या

हेही वाचा - 2021 वर्षाच्या बारावीच्या परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन!

प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमैय्या यांनी सांगितले की, आता गंभीर लढाईला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा संकल्प आम्ही केला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे अलीबाबा ४० चोर मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होणारच आहे.

सरकारची दडपशाही सुरू आहे, त्याच्यामुळे मला काल रात्री कोल्हापूरला जाण्यासाठी मुलुंड पूर्व पोलिसांनी रोखले होते. पोलिसांवर प्रत्यक्षपणे सरकारचा दबाव होता. त्यामुळे त्यांनी मला घरात स्थानबद्ध केले होते, परंतु त्यांच्या नोटीसवरती मी सही केली आणि माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्याला मार्गस्थ झालो. माझ्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कोल्हापूर जिल्हाधिकारी करतील, पण मध्येच मला प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. हसन मुश्रीफ मिया यांना वाचवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर मी घोटाळ्यांचे आरोप लावताच लगेच ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले आणि उद्या ते बरे झाल्यानंतर थेट कोल्हापुरात जाणार होते. त्यामुळे, त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीविताला धोका आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. सरकारकडून उघड धमकी मला प्राप्त होत आहे आणि आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसून ही कारवाई गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे, त्यामुळे हे सरकार कोण चालवत आहे, हे आपल्यालासुद्धा माहीत आहे, असे सोमैय्या म्हणाले.

हसन मुश्रीफ मिया यांना वाचवण्यासाठी सरकारला आदेश शरद पवार यांनी दिलेत, हे स्पष्ट होत आहे. परंतु, मी महाराष्ट्र घोटाळेमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे आणि या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अलिबागमधील कोरले गावमधील १९ बंगल्यांची पाहणी करून माहिती गोळा करणार आहे, असे सोमैय्या म्हणाले.

हेही वाचा - मोदी सरकारला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - श्रीरंग बरगे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.