ETV Bharat / city

अनिल देशमुखांवर काय होते आरोप? किती वेळा बजावण्यात आला समन्स, वाचा सविस्तर...

author img

By

Published : Nov 1, 2021, 2:58 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी वाझेंना बोलवून घेत दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे आरोप सिंग यांनी यातून केले होते.

अनिल देशमुखांवर काय होते आरोप? किती वेळा बजावण्यात आला समन्स, वाचा सविस्तर...
अनिल देशमुखांवर काय होते आरोप? किती वेळा बजावण्यात आला समन्स, वाचा सविस्तर...

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडीसमोर हजर झाले आहेत. सोमवारी सकाळी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर झाले. परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांप्रकरणी ते ईडीसमोर हजर झाले होते.

परमबीर सिंगांचे आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्स यूनिट हेड होते. तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंना बोलवून घेत दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे आरोप सिंग यांनी यातून केले होते. या आरोपांनुसार, देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे असे आरोप सिंग यांनी केले होते.

ईडीचे पाच वेळा समन्स

या आरोपांप्रकरणी ईडीने देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले होते. चौकशीसाठी हजर होण्याकरता ईडीने देशमुख यांना समन्स बजावले होते. चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर 'लूक आऊट' नोटीसदेखील बजावली जाऊ शकते असेही संकेत ईडीने तेव्हा दिले होते.

सत्र न्यायालयाचे समन्स

दरम्यान, देशमुख ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने 1 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले होते. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टाने देशमुखांना दिले होते. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयलासुद्धा दिले होते. ईडीने पाचवेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख गैरहजर राहिले होते. देशमुख यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानेसुद्धा देशमुखांच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. अद्यापही यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. मात्र, अनिल देशमुख वारंवार ईडीच्या चौकशीला गैरहजर राहत असल्याने मुंबई सत्र न्यायालयाने देशमुखांना समन्स बजावले. 16 नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. ईडीने देशमुख तपासात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पत्नीलाही समन्स

ईडीने देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले होते. या समन्समध्ये त्यांना चौकशीच्या अनुषंगाने काही कागदपत्रांसोबत मुंबई येथील कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.