ETV Bharat / city

मंत्रालयात जाऊन त्यांनी काय दिवे लावले? उद्धव ठाकरेंचा टोला

author img

By

Published : Nov 1, 2021, 3:14 PM IST

मंत्रालयात जाऊन त्यांनी काय दिवे लावले? उद्धव ठाकरेंचा टोला
मंत्रालयात जाऊन त्यांनी काय दिवे लावले? उद्धव ठाकरेंचा टोला

त्यांनी मंत्रालयात जाऊन काय दिवे लावले? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे घरून काम होत असेल, तर मंत्रालयात पाट्या टाकण्याची गरज काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : मी मंत्रालयात जात नाही घरातून काम करतो, अशी सातत्याने ओरड करणाऱ्यांना माझा सवाल आहे, त्यांनी मंत्रालयात जाऊन काय दिवे लावले? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे घरून काम होत असेल, तर मंत्रालयात पाट्या टाकण्याची गरज काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य न करता फोडा काय बॉम्ब फोडायचे ते. पण पाकिस्तानला कधी बॉम्ब फोडणार ते सांगा असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांसोबत आयोजित स्नेहभोजनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंत्रालयात जाऊन त्यांनी काय दिवे लावले?
गेल्या दीड वर्षांच्या काळात जनतेच्या हिताची कामे करताना अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. मात्र, तरीही विरोधक मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, कामे होत नाहीत. अशी ओरड करतात. मात्र जे लोक मंत्रालयात येत होते, त्यांनी काय दिवे लावले आहेत. हे मी आता बघतोच आहे. त्यामुळे मंत्रालयात येऊन पाट्या टाकण्यापेक्षा जनतेच्या हिताची कामे जर घरातून होत असतील तर त्यात काय चूक आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी बोलताना उपस्थित केला.

केंद्राने मुस्लीम आरक्षण द्यावं-मुख्यमंत्री
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालाच आहे मात्र जे मुस्लीम आरक्षण मागत आहे त्याबाबत केंद्र सरकारने विचार करणार की नाही हे स्पष्ट करावं असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

तिसऱ्या लाटेचा धोका कायम
पाश्चात्य देशांमध्ये कोरोनाची तिसरीला आली आहे. लस न घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे अजूनही जास्त आहे. त्यामुळे त्यांना यावेळी भीती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनावर अद्यापही रामबाण औषध सापडलेले नाही. त्यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी कोरोना प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कॅमेराच्या केवळ बॅटरी चार्ज-ठाकरे
ठरल्याप्रमाणे सर्व काही झालं असतं, तर मला माझा फोटोग्राफीचा छंद जोपासता आला असता. त्याचं प्रदर्शन भरवता आला असतं. मात्र, सध्या यातलं काहीच करता येत नाही. गेल्या दोन वर्षांपासून माझ्या फोटोग्राफीच्या छंदाला वेळ देता आलेला नाही. केवळ कॅमेऱ्याच्या बॅटरी चार्ज करून ठेवल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.