मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीचे ठरले आहेत. राज्यातील जनतेचा कौल लक्षात घेता महाआघाडीला सत्तेच्या जवळ जाता आले असते, परंतु वंचितने यापासून रोखल्याचे चित्र निवडणूक निकालाच्या आकडेवारीनंतर स्पष्ट झाले आहे. तब्बल २५ जागा वंचितच्या फटक्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या आहेत.
हेही वाचा - दीड लाखांहून अधिक मते घेण्यात 'आघाडी'चे उमेदवारच आघाडीवर
वंचितने लोकसभा निवडणुकीत ४१ लाख मते घेतल्याने त्याचा मोठा फटका आघाडीला बसला होता. यावेळीही वंचितने लढवलेल्या २३४ मतदारसंघात २४ लाखांहून अधिक मते घेत तब्बल २५ जागांवर काँग्रेस -राष्ट्रवादीचे उमेदवार अल्पशा मताधिक्याने पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले असले तरी २५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार तीन ते दहा हजाराच्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्या जागांमध्ये चाळीसगाव, दौंड, गेवराई, जिंतूर, खडकवासला, माळशिरस, उस्मानाबाद, तुळजापूर, पैठण, चेंबूर, यवतमाळ, अकोला पश्चिम, अर्णी, बल्लारशा,चिमूर, धामणगाव रेल्वे, खामगाव, नागपूर दक्षिण, नांदेड दक्षिण, राळेगाव, शिवाजीनगर, उल्हासनगर, चांदीवली, आणि पुणे कँन्टोमेंट या मतदारसंघांचा समावेश आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर पीएमसी बँक खातेदारांची काळी दिवाळी
राज्यात यावेळी वंचितची काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी असती तर आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या. याचा थेट परिणाम हा युतीला सत्तेच्या जवळ जाता जाता रोखता आले असते. युतीला केवळ १४५ जागांवर रोखता आले असते, हे आता निकालाच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत वंचितला एकही जागा जिंकता आली नसली तरी, या निवडणुकीत त्यांनी गेमचेंजरची भूमिका पार पाडली आहे, यावेळी तब्बल ९ मतदारसंघात वंचितचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर आले आहेत. यात अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, कळमणुरी, लोहा, मुर्तिजापूर, सोलापूर शहर उत्तर, वाशिम, बुलडाणा हे मतदारसंघ असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. तर, वंचित आघाडीने विधानसभेच्या २३४ जागा स्वबळावर लढवल्या होत्या. तर, २३ ठिकाणी समविचारी पक्षांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यातील ५० जागी वंचितने चांगली मते घेतली आहेत.
हेही वाचा - राज्यातील जनतेने भाजपचा सत्तेचा माज उतरवला - नवाब मलिक