मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतरही मुंबईमधील दवाखाने (Mumbai Municipal Corporation Health Department) आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. मुंबईत १५ हजार लोकसंख्येमागे एका दवाखान्याची गरज आहे. मात्र मुंबईत ६५९ दवाखान्यांची कमतरता आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ३० टक्के पदे रिक्त असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे.
दवाखान्यांची संख्या कमी : सन २०१२ - १३ ते २०२२ - २३ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठीच्या तरतुदींमध्ये १९६ टक्के वाढ झाली आहे. आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प वाढला असताना वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता आहे. १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे. मात्र सध्यस्थितीत १८७ दवाखाने आहेत. १८७ दवाखान्यापैकी १६३ दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत म्हणजेच ७ तास सुरु असतात. तर १२ दवाखाने सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत सुरु असतात. त्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होत असल्याने अनेकांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करणाऱ्या मुंबई महापालिकेने आरोग्यावर भर देणे गरजेचे असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी म्हटले आहे.
इतक्या दवाखान्यांची आवश्यकता : मुंबईमधील शहरी विभागात २७ टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना १३३ दवाखान्याची, पश्चिम उपनगरातील ४३ टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना ३१५ दवाखान्याची पूर्व उपनगरातील ५१ टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना २११ दवाखान्याची आवश्यकता आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : असंसर्गजन्य रोगांपासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१५ च्या तुलनेत २०३० पर्यंत एक तृतीयांश पटीने कमी करणे आवश्यक होते. मात्र २०१५ ते २०२० या कालावधीत मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५३० टक्क्यानी तर उच्च रक्तदाबाच्या मृत्यूमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. आरोग्यविषयक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मृत्यू आणि आजारांचा डेटाचे प्रभावीपणे व रियल टाइम व्यवस्थापन व्हायला हवे, तसे झाल्यास आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. सरकारी दवाखान्यात चांगले उपचार मिळतात, अशा प्रकारे लोकांचा विश्वास वाढायला हवा, असेही म्हस्के यांनी अहवालातील निरीक्षण मांडताना स्पष्ट केले आहे.
रुग्णालय, आरोग्य केंद्रावर ५ टक्के प्रश्न : मुंबई महापालिकेच्या विविध समित्या व सभागृहात विविध पक्षांच्या नगरसेवकांनी १०० प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये फक्त ५ टक्के प्रश्न रुग्णालय आरोग्याविषयी उपस्थित केले आहे.
हेही वाचा: Betel Leaves : खायच्या पानांचे सेवन केल्याने अनेक रोग आणि समस्यांपासून होते सुटका