ETV Bharat / city

भाजपचे १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात, डिसेंबरमध्ये धमाका करू - शिवसेना नेते यशवंत जाधव

author img

By

Published : Oct 18, 2021, 7:13 PM IST

Updated : Oct 18, 2021, 9:22 PM IST

स्थायी समितीचे अध्यक्ष य़शवंत जाधव म्हणाले, की महापालिकेतील भाजपचे नगरसेवक सत्ता नसल्याने कोणतीही पदे मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. तसेच आपल्याच पक्षातील वरीष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभाराला नगरसेवक कंटाळले आहेत. यामुळे या नगरसेवकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर बेछूट आरोप केले जात आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

मुंबई - मुंबई महापालिकेतील भाजपच्या नेतृत्वावर अनेक नगरसेवक नाराज आहेत. अशा नाराज नगरसेवकांपैकी १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्यात याबाबत धमाका करू, असा गौफ्यस्फोट महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. तर स्थायी समिती अध्यक्षांचा दावा हा फुसका बार ठरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.


मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर येताच भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेवर घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांमध्ये १८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाला उत्तर देण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

निवडणूक तोंडावर येताच भाजप-शिवसेनेत कलगीतुरा

स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणाले, की महापालिकेतील भाजपचे नगरसेवक सत्ता नसल्याने कोणतीही पदे मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. तसेच आपल्याच पक्षातील वरीष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभाराला नगरसेवक कंटाळले आहेत. यामुळे या नगरसेवकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर बेछूट आरोप केले जात आहेत. भाजपमधील त्रस्त असलेले १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात याबाबतचा धमाका करू असा गौफ्यस्फोट जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा-राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार - मुख्यमंत्री

आश्रय योजनेत घोटाळा नाही -
मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरही झाले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवालही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत यांनी केला आहे. आश्रय योजना आणि श्रम साफल्य योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत. मात्र, त्या एकत्र करून ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. हा आरोप चुकीचा असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून महाआघाडी अन् भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप !

फुसका बार ठरेल -
भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले, की त्यांची काय तयारी झाली मला माहीत नाही. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना स्वप्न पाहायला हरकत नाही. स्वप्न रंजनात ते राहू शकतात. भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही. यामुळे स्थायी समिती अध्यक्षांचा गौफ्यस्फोट हा फुसका बार ठरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेत्यांनी दिली आहे. लाड पागे समितीने सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना सुरू करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना माहुल येथे १३० घरे देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आताचे सरकार याची अंमलबजावणी करत नाही. याच मुंबईमध्ये एसआरएची घरे बांधताना प्रति चौरस फूट १५०० रुपये दराने बांधकाम केले जात आहे. मात्र, पालिका आश्रय योजनेत घरे बांधताना प्रति चौरस फूट ४६०० रुपये दराने घरे बांधत आहे. हाच मोठा घोटाळा आहे. यावर स्थायी समिती अध्यक्षांनी बोलावे, असे आवाहन भाजपचे गटनेते शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता द्या - एसटी कर्मचारी काँग्रेस!

निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार -

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते, की महानगरपालिकेने लोकमान्य टिळक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी निविदा काढली होती ज्यात ४ लोकांनी भाग घेतला होता. शेओना कॉर्पोरेशन ३७९३ चौरस फूट दराने सर्वात कमी निविदाधारक होती. हे निविदा निवारा योजनेच्या गट (2) आणि गट (3) च्या ५ दिवस आधी उघडली ज्यात एकूण बांधकाम ३२११८० चौरस फूट आहे आणि एकूण खर्च १२१८५ कोटी आहे. ६ निविदाकारांना फक्त योजना सादर केल्यावर ५ टक्के दिले गेले होते, तर दर कमी झाल्यानंतरही योजना पारित झाल्यानंतर दोन गटांना १ टक्का दिले जातील, जे कायद्याचे उल्लंघन आहे. ८ गटांमध्ये सुमारे १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा नुकतेच भाजपचे गटनेते शिंदे यांनी केला होता.

Last Updated :Oct 18, 2021, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.