ETV Bharat / city

'निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका'

author img

By

Published : Feb 14, 2021, 9:55 AM IST

पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून काश्मीरातील ३७० कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी आंदोलनजीवी अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

narendra modi  over savarkar andolan jeevi
narendra modi over savarkar andolan jeevi

मुंबई - पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता, अशा रोखठोक शब्दांत राऊत यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

गेल्या दीडशे वर्षापासून आंदोलने करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा -


देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. 'आंदोलनजीवी' असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱया कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱया प्रत्येकाची थट्टा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले -

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलनजीवी निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. उमटत आहेत. शेतकरी आंदोलनाविषयी पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “काश्मिरातून ३७० कलम हटवणे हे भाजपाच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले,” अशी खंत व्यक्त करत राऊत यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

सावरकरांना आंदोलनजीवी म्हणू नका

वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र होते व त्याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीसारखी आंदोलने केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आले नाही. निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका. आंदोलन म्हणजे लोकशाहीतील सूर्यकिरणे आहेत. देश त्यामुळे जिवंत राहतो. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जी आंदोलने केली त्यांना काय म्हणावे?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या आंदोलनांचं काय?

भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल. कश्मीरातून 370 कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळय़ात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता 'आंदोलनजीवी' ठरवले गेले. क्रांतिकारक सत्तेवर येताच सगळ्यात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो. आपल्या देशात हेच सुरू आहे काय?, असाही सवाल राऊत यांनी विचारला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.