मुंबई -राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) होत असून अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही धरणं भरली आहे. तर काही धरण क्षेत्रांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अशातच येणाऱ्या काळात पाऊस हा आता हळूहळू ओसरणार आहे. पावसाने हवामान खात्याचा यलो अलर्ट खरा ठरवत, मुंबईसह, ठाणे, नवीमुंबई, पालघर, रायगड जिल्ह्याला कधी संततधार, तर कधी मुसळधार कोसळत झोडपून काढले. दिवसभर पावसाची संततधार सुरु राहिल्याने दोन दिवस वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मात्र, आज सकाळपासूनच पावसाने उसंत घेतल्याने चाकरमानी देखील सुखावले आहेत. ( Rain Brought Relief In Some Places In The State )
पावसाने थोडी उसंत घेतली - गणेशोत्सवानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यापासून मागील दोन दिवस मुंबईसह महानगरात ठाण मांडून बसला आहे. शुक्रवारी पावसाने जोरदार बॅटींग केली. धो धो कोसळणाऱ्या जलधारांमूळे मुंबईसह महानगर प्रदेशातील काही सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी मात्र सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. दोन दिवस पावसाच्या तडाक्यात सापडलेल्या मुंबईकरांच्या छातीत धड धड वाढली होती. मात्र पावसाने उघडीप घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच घराबाहेर पडलेले चाकरमानी देखील सुखावले आहेत.
रविवारनंतर जोर ओसरणार - हवामान खात्याने शनिवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्याला यलो अलर्ट, तर राज्यातील किनारपट्टींच्या भागांना ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, अग्निशमन दल, शहर आपत्ती पथक, तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. रविवार नंतर पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.