ETV Bharat / city

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परिवहनमंत्र्यांची माहिती

author img

By

Published : Nov 24, 2021, 6:55 PM IST

Updated : Nov 24, 2021, 9:58 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Strike) यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अनिल परब
अनिल परब

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Strike) यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती. यावर शरद पवार यांनी वेतनवाढ करण्याबाबत सूचना मंत्री परब यांना दिल्या होत्या. तसेच अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना याबाबत तरतूद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दोन बैठका पार पडल्या. त्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एस कर्मचारी संप मागे घेणार का..?

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीनंतर पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) उपस्थित होते. पगारवाढीची (Payment Increase) घोषणा परिवहन मंत्री परब यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी पडळकर व खोत हेदेखील उपस्थित होते. यावेळी संप मागे घेणार का, असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता आंदोलकाांशी चर्चा करून सांगणार, असे उत्तर आमदार पडळकर यांनी दिली.

आता पगार 10 तारखेच्या आतच होणार

गेल्या वर्षी करोनामुळे एसटी आर्थिक नुकसानीमध्ये होती. अशा स्थितीत देखील राज्य सरकारने एसटीला 2 हजार 700 कोटींची मदत पगारासाठी केली होती. पण, काही कारणास्तव त्यांचे पगार उशिरा होत होते. यादरम्यान काही कामगारांनी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले होते. म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आधी होईल, ही हमी घेतलेली आहे. त्यामुळे एसटीच्या कामगारांचा पगार कधीही 10 तारखेच्या पुढे जाणार नाही.

विलिनीकरणाबाबत काय म्हणाले परब..?

एस कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी विलिनीकरणाची होती. याबाबत परिवहन मंत्री परब म्हणाले, हा विषय उच्च न्यायालयात गेला असून त्यावर त्रिसदस्यीय समिती बनवली. बारा आठवड्यात या समितीचा अहवाल येईल. विलिनीकरणाबाबत कर्मचाऱ्यांचे जे म्हणणे आहे ते समितीसमोर मांडावा, असे न्यायालयाचे आदेश आहे. त्यामुळे कामगारांची विलिनीकरणाची मागणी न्यायप्रविष्ट आहे. समितीचा जो काही निर्णय असेल तो मान्य करू, अशी शासनाची भूमिका आहे. विलिनीकरणाबाबत न्यायप्रविष्ट बाब असल्याने तिढा निर्माण झाला. संपामुळे राज्यातील ग्रामीण जनतेची, शाळेय विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे संपावर तोडगा काय काढायचा यावर सरकार प्रयत्नशील होते, असे त्यांनी सांगितले.

...तर योग्य तो निर्णय घेण्यात येईल

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणा करतानाच मंत्री परब यांनी एसटीचे नुकसान वाढत आहे, कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आव्हान केले. कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संप मागे घेतला नाही तर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री परब यांनी दिली.

उत्पन्न वाढीबाबत प्रोत्साहन भत्ता

एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. तसेच कामगारांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करताना, आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही परब म्हणाले.

आमदार खोत व पडळकर यांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय

राज्य शासनाची आपली विस्तृत भूमिका मांडली. विलीनीकरणाचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर कायम आहेत. आजपर्यंत विलीनीकरणावर चर्चा होत होती. मंगळवारी (दि. 23) अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव मांडला. आज (दि. 24) त्यावर सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती कामगारांना देऊ. त्यानंतर संपाबाबतचा पुढील धोरण आखले जाईल, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले. तर एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त संप सुरू आहे. भाजपचा किंवा कोणत्या पक्षाचा संप नाही. राज्य शासनाच्या निर्णयाची माहिती कामगारांना देऊन पुढील भूमिका ठरवू, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. मात्र, कामगारांच्या विविध मागण्यांच्या मुद्यांवरून पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर दोघांनीही पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

अशी होणार पगारवाढ...

सेवा बजावणारे कर्मचारी मुळ वेतनात झालेली पगारवाढ
नवीन कर्मचाऱ्यांनापाच हजार रुपये
10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांनाचार हजार रुपये
20 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना2 हजार 500 रुपये
30 वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे सेवा झालेल्यांना2 हजार 500 रुपये

हे ही वाचा - Corona Third Wave : महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर, सौम्य स्वरूपाची असेल - राजेश टोपे

Last Updated :Nov 24, 2021, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.