MLC Election 2022 : विधान परिषदेच्या निवडणुकीचा रंगणार आखाडा

author img

By

Published : Jun 14, 2022, 3:11 PM IST

संपादित छायाचित्र

राज्य सभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा ( MLC Election 2022 ) देखील रंगणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून 20 जूनला ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाकडून आपली सर्व ताकद पणाला लावण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा ( MLC Election 2022 ) आखाडा देखील रंगणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून 20 जूनला ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाकडून आपली सर्व ताकद पणाला लावण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांनाही भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र, शेवटच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूकही चुरशीची ठरणार आहे.

'हे' उमेदवार आहेत

  • भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
  1. प्रवीण दरेकर
  2. राम शिंदे
  3. श्रीकांत भारतीय
  4. उमा खापरे
  5. प्रसाद लाड
  • महाविकास आघाडी
  1. चंद्रकांत हांडोरे ( काँग्रेस )
  2. अशोक उर्फ भाई जगताप ( काँग्रेस )
  3. रामराजे निंबाळकर ( राष्ट्रवादी )
  4. एकनाथ खडसे ( राष्ट्रवादी )
  5. आमश्या पाडवी ( शिवसेना )
  6. सचिन अहिर ( शिवसेना )
  • महाविकास आघाडीचे संख्याबळ
  1. शिवसेना - 55
  2. राष्ट्रवादी काँग्रेस - 53
  3. काँग्रेस - 44
  4. बहुजन विकास आघाडी - 3
  5. समाजवादी पार्टी - 2
  6. प्रहार जनशक्ती पार्टी - 2
  7. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - 1
  8. शेतकरी कामगार पक्ष - 1
  9. स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
  10. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 1
  11. अपक्ष - 8
  12. सत्ताधारी महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ- 171
  13. एआयएमआयएमचे दोन आमदार या निवडणुकीत कोणाला मतदान करणार याकडे ही सर्वांचे लक्ष असणार आहे.
  • भाजपकडील संख्याबळ
  1. भारतीय जनता पक्ष - 106
  2. जनसुराज्य शक्ती - 1
  3. राष्ट्रीय समाज पक्ष - 1
  4. महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1
  5. अपक्ष - 5
  6. विरोधक भाजपकडे असलेले एकूण संख्याबळ - 114

अपक्ष ठरणार 'गेम चेंजर' - राज्यसभेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करत भाजपने सहावी जागा जिंकली अशात आता विधान परिषदेच्या 10 व्या जागेसाठी भाजप किती फोडफाड करते हे पाहावे लागेल. त्यातच राज्यसभेच्या निवडणुकीत सोबत असलेल्या अपक्ष आमदारांवरच शिवसेनेने मतदान न केल्याचा संशय घेतला आहे. यावरुन अपक्ष उमेदवार नाराज असून महाविकास आघाडीसोबत रहायचे की नाही, याबाबत इशारा करावा लागेल, असा इशारा दिला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष कोणती भूमिका घेणार याबाबतही चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. यामुळे अपक्ष आमदाराच गेम चेंजर ठरतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

काँग्रेसला आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास - महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षाकडून प्रत्येकी दोन दोन उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस केले आपले दोन्ही उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. मात्र, काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जवळपास दहा अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करावी लागेल. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची जुळवाजुळव महाविकास आघाडीने केली असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

या निवडणुकीतही चमत्कार करू - राज्यसभा निवडणुकीमध्ये आपला तिसरा उमेदवार जिंकून आणण्याचा चमत्कार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पुरेसे संख्याबळ नसतानाही अचूक नियोजनाच्या जोरावर देवेंद्र फडणवीस यांनी ही बाजी मारली. त्याचप्रमाणे विधान परिषदेतही आम्ही चमत्कार करू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये असलेले मतभेदाचा फायदा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीतही होईल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अपक्ष नाराज - राज्यसभेच्या निवडणुकीत राज्य सरकार सोबत असलेल्या सहा अपक्ष आमदारांनी शिवसेनेला मतदान न केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केला आहे. याबाबत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्या पक्षाच्या इतर दोन आमदारांनी मतदान न केल्याचा आरोप करण्यात आला. यावरून अपक्ष आमदारांची महाविकास आघाडीवर नाराजी ठळकपणे पाहायला मिळाली. याबाबत देवेंद्र भुयार यांनी थेट शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊत यांची भेट घेऊन आपली नाराजीही व्यक्त केली. इतर आमदारांनीही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आणि लहान गटातील आमदारांच्या मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. अशावेळी अपक्ष आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्ष आमदारांची मनधरणीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत तुम्ही त्यांनी अपक्ष आमदारांनी व सोबत संवाद साधण्याच्या सूचना सर्व नेत्यांना केल्या आहेत.

हेही वाचा - Presidential Election 2022 : शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत : राष्ट्रवादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.