मुंबई - २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिसांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (गुरूवार) श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार भाई जगतापही उपस्थित होते. पोलिस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
उद्धव ठाकरे यांची उपस्थिती..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी राज्यपालांनंतर श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी हुतात्मांचे नातेवाईकही उपस्थित होते.
मुंबई पोलिसांच्या १८ जवानांना आले होते वीरमरण..
26 नोव्हेंबरच्या दिवशी रात्री आठ वाजता मुंबईत दाखल झालेले 10 दहशतवादी हे वेगवेगळ्या गटात विखुरले होते. यात दोघांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा व खाण्यापिण्याचे सामान होते. मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, नरीमन हाऊस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, विलेपार्ले अशा ठिकाणी गेलेल्या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जिवाची बाजी लावली होती. यामध्ये मुंबई पोलिसांच्या 18 जवानांना वीरमरण आले होते. त्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या अधिकाऱ्यांनाही वीर मरण आले होते. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी 400 लष्कर कमांडो, 300 एनएसजी कमांडो तसेच 100 मार्कोस कमांडो हे घटनास्थळी पाठवण्यात आले होते.
दहा ठिकाणी केले होते हल्ले..
मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ले केले होते. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागच्या गल्लीत देखील हा हल्ला घडवण्यात आला होता. याबरोबरच विलेपार्ले परिसरात एका टॅक्सीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
हेही वाचा : '26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; हल्ला झालेल्या ठिकाणची जाणून घ्या स्थिती