ETV Bharat / city

हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? आजच्या सामना आग्रलेखात केंद्र सरकारवर घणाघात

author img

By

Published : Oct 6, 2021, 9:28 AM IST

आजच्या सामना अग्रलेखात केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत देशातील सध्याची परिस्थिती आणि लोकशाही देशाची काय अवस्था झाली याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. लखीमपूर खीरी येथे भाजप मंत्र्याच्या मुलाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. त्यानंतर देशात मोठे संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? असा संतत्प सवाल आजच्या सामना आग्रलेखात करण्यात आला आहे.

हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? आजच्या सामना आग्रलेखात केंद्र सरकारवर घणाघात
हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? आजच्या सामना आग्रलेखात केंद्र सरकारवर घणाघात

मुंबई - प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली. यावर सामना अग्रलेखात आपण काय कृत्य करत आहोत. आणि या कृत्यामुळे आपली देशात नाही तर जगभरात काय किंमत केली जाईल याचे भान येथील योगी सरकारसह केंद्र सरकारने ठेवायला हवे होते अशी टिप्पणी प्रियंका गांधी यांना नजरकैदैत ठेवल्याच्या प्रकारावर केली आहे. मागील 36 तासांपासून प्रियंका यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरडय़ा जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या 'नात' आहेत, याचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते.

'माझा अपराध काय?'

कैदखान्यातून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला जळजळीत प्रश्न विचारला आहे, 'माझा अपराध काय? कोणत्याही वॉरंटशिवाय, एफआयआरशिवाय मला डांबून का ठेवले? शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे काय?” प्रियंका गांधी या लखीमपूर खेरीत सर्वप्रथम पोहोचल्या. चिरडून मारलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास त्यांना भेटायचे होते. प्रशासनाने प्रियंका यांना नुसतेच रोखले नाही, तर त्या मुलीस धक्काबुकी करून गाडीत कोंबले. प्रियंका गांधी या झुंजार आणि लढाऊ आहेत. त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार आहे. सीतापूरच्या तुरुंगातूनही त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाचे पडसाद जगभर उमटले आहेत. सरकारने कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे व विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळायचे. ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील असही यामध्ये म्हटले आहे.

...तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगड्या घालत रस्त्यावर उतरली असती

खीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सुरू आहे काय? असा संतप्त आणि थेट प्रश्न यामध्ये विचारण्यात आला आहे. लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. 'तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच,' असा आव मंत्रीपुत्रने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडीओच समोर आला. त्यामुळे सरकार काय करणार? हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगड्या घालत रस्त्यावर उतरली असती. महिलांवरील अत्याचाराची स्वतंत्र व्याख्या भाजपने केली असून त्या व्याख्येत इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाही.

लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता

खीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सुरू आहे काय? असा संतप्त आणि थेट प्रश्न यामध्ये विचारण्यात आला आहे. आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना लखनौत उतरण्यापासून रोखले जाते. हा संघराज्यातील एक विचित्र प्रकार घडला आहे. लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता. आज जे घडले आहे ते भयंकर आहे. लखीमपूरची लढाई राजकीय नसून जगभरातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्काची बनली आहे. ब्रिटिश काळात लाला लजपतराय हे शेतकऱ्यांचे नेते ब्रिटिश जुलुमाविरुद्ध रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर निर्घृण हल्ला ब्रिटिशांनी केला. त्यातच लालाजींचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेत शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणारा जनरल डायर ब्रिटिश होता. मुंबईत परदेशी कापडाविरोधात आंदोलन करणाऱ्या बाबू गेनूच्या अंगावरून ट्रक नेणाराही ब्रिटिश होता. पण लखीमपुरात हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालणारा स्वतंत्र हिंदुस्थानातील केंद्रीय मंत्र्याचा पुत्र आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे सर्व घडले आहे. अशी खंतही यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले

जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाड्या घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर 'देश खतरे में है!' असा प्रश्न यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली 'बार्डोलीचा सत्याग्रह' का केला, हे शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. गांधीजींनी मिठापासून परदेशी कपड्यांपर्यंत केलेली आंदोलने शेतकऱ्यांच्याच बलिदानाने यशस्वी झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाड्या घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर 'देश खतरे में है!' असे मानावेच लागेल.

शेतकऱ्यांना काय हवे?

तीन कृषी कायद्यांवर फेरविचार व्हावा असे त्यांना वाटते, पण सरकार ऐकायला तयार नाही. केंद्र सरकारला शेतीचे खासगीकरण करून मर्जीतल्या उद्योगपतींना देशातील शेतजमीन द्यायची आहे. सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही. देशाचे खासगीकरण सुरू झाले आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?

हेही वाचा - मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डरशिवार व FIR दाखल न करता 28 तास कोठडीत ठेवले - प्रियंका गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.