नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा, म्हणाले बाळासाहेबांचे आशीर्वाद डोक्यावर आहेत

author img

By

Published : Aug 20, 2021, 12:03 PM IST

राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा

साहेब तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता, जे काही घडले, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिले असते. बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. ते म्हणाले असते की नारायण अशीच प्रगती करत रहा, अशा भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली. कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा, असेही राणे म्हणाले. ज्

मुंबई - केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा आज (शुक्रवारी) घाटकोपर पश्चिम, पूर्व तसेच मुलुंड येथे मार्गक्रमण करणार आहे. या यात्रेदरम्यान राणे यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले असून शिवसेनेनेही प्रत्त्युत्तर दिल्याने ही यात्रा चर्चेचा विषय बनली आहे. आज यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा जोरदार समाचार घेतला आहे. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाच्या शुद्धीकरणावरूनही त्यांनी शिवसेनेला जोरदार प्रहार केला.

राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा
राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा

काय म्हणाले नारायण राणे -
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता, जे काही घडले, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिले असते. बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. ते म्हणाले असते की नारायण अशीच प्रगती करत रहा, अशा भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली. कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा, असेही राणे म्हणाले. ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलावे, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ. कोणी आपल्यात मांजरीसारखे आडवे येऊ नये, असा टोलाही राणे यांनी शिवसेनेला लगावला.

येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत पापाचा ३२ वर्षांचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना नारायण राणे म्हणाले की मुंबई महापालिका जिंकणे हीच जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. काहीही झाले तरीही महापालिका जिंकणारच. मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर साऱ्यांकडेच जबाबदारी दिली आहे. आता कोरोनाचे नियम सांगून उगाच उपदेशाची भाषा करू नये. सत्तेतील फारच थोडे दिवस शिल्लक राहिले असल्याचा टोलाही राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांना लगावला.

तसेच आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थळ शुद्ध करण्याऐवजी मनं शुद्ध करा. गोमूत्र आम्ही पवित्र मानतो. ते हातात घेण्याइतकीही यांची पात्रता नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला.



शिवसेनेचे राणेंना प्रत्त्युत्तर -


केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्‍यांदाच नारायण राणे मुंबईत आले आहेत. जन आशीर्वाद यात्रे दरम्यान गुरुवारी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. या भेटीनंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, मुंबई महापालिकेत 32 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. 32 वर्षातील पापाचा घडा भरला असून भाजपा यावेळी मुंबई महापालिका जिंकेल असे वक्तव्य केले आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणेंना प्रत्युत्तर देताना म्हटले की, देशात लोकशाही आहे. कसे बोलावे कसे वागावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. नारायण राणे यांनी ज्या बत्तीस वर्षाच्या कालावधीचा उल्लेख केला आहे, त्या बत्तीस वर्षात ते शिवसेनेकडून महापालिकेचे सदस्य होते, बेस्ट समितीचे ते चेअरमन झाले, राज्याचे मुख्यमंत्रीही झाले, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. ही पदे भूषवताना राणे यांना पापाचा घडा दिसला नाही का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेला आहे.

तेच मुख्यमंत्री अव्वल -

नारायण राणे मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत नेहमी बोलत असतात. त्यांना मुख्यमंत्री मानत नाहीत, असे बोलतात. राणे ज्या मुख्यमंत्र्यांना मानत नाहीत, तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात अव्वल ठरले आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई पालिकेने चांगले काम करून दाखवले आहे. मुंबईकर, मुख्यमंत्री आणि पालिकेने कोरोनाचा प्रसार कमी करून दाखवला आहे. त्याची दखल देशभरात तसेच जगभरात घेण्यात आली आहे. यामुळे तुम्ही कितीही आकांडतांडव केला तरी लोक विश्वास किती ठेवतात हा मागील इतिहास पाहून पहा, असा टोला महापौरांनी लगावला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक सोपी आहे, असे आम्ही कधीच बोलत नाही. निवडणुकीत इतिहास-भूगोल बदलतो. प्रत्येक निवडणूक ही कठीणच असते. कठीण पेपर सोडवायचा शिवसेनेला आवडतं, असा टोला महापौरांनी भाजपाचे नाव न घेता लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.