ETV Bharat / city

दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, 246 ठिकाणी विसर्जनाची सोय

author img

By

Published : Sep 11, 2021, 10:22 AM IST

Updated : Sep 11, 2021, 11:04 AM IST

मुंबईत गणेशत्सोव मोठ्या थाटात साजरा केला जातो, तितक्याच भक्तीभावाने गणरायाला निरोपही दिला जातो. यामध्ये दीड, पाच, सात आणि दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. मात्र यावेऴी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी काही निर्बध लागू करण्यात आले आहेत. विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने विसर्जानासाठी योग्य ती उपाय योजना केली आहे.

थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध
थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध

मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीचे दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी विसर्जित केल्या जातात. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज शनिवारी(११ सप्टेंबर) दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव -

मुंबई शहरात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत. पालिका कर्मचारी गणेश मूर्तींचे विसर्जन करणार आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

समुद्राला मोठी भरती -

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी केले जाणार आहे. मात्र शनिवारी (११ सप्टेंबर) दुपारी २.३४ वाजता ४.२२ मीटरची, तर १२ सप्टेंबरला मध्यरात्री ३.१२ वाजता ४.२३ मीटरची समुद्राला भरती आहे. १९ सप्टेंबरला दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला सकाळी ११.०८ वाजता ४.३ मीटरची, रात्री ११.२० वाजता ४.८ मीटरची तर २० सप्टेंबरला सकाळी ११.४४ वाजता ४.४० मीटरची भरती असणार आहे. यंदा समुद्रात जाऊन विसर्जन करण्यास बंदी असल्याने दुर्घटना होणार नाही. तरीही पालिका दक्ष असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विसर्जन स्थळांवर पुरविण्यात आलेल्या सुविधा -

नियंत्रण कक्ष - २१९, स्टील प्लेट - ७८६, जीवरक्षक - ८१२, मोटरबोट -१४२, जर्मन तराफा - ४३, स्वागत कक्ष - २३७, फ्लड लाईट - ३६५८, सर्च लाईट - ३६३, प्रथमोपचार केंद्र - १५४, निर्माल्य कलश - ३५६, निर्माल्य वाहन डंपर टेंपो - ३३८, तात्पुरती शौचालये - १३०, निरीक्षण मनोरे - ४७, रुग्णवाहिकांची संख्या - ८१, संरक्षक कठडे - आवश्यकतेनुसार, विद्युत व्यवस्था - आवश्यकतेनुसार

तर साथरोग कायद्यानुसार कारवाई -

मुंबई महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. उत्सव प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा, अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, अंतर्गत कारवाईस पात्र ठरेल असे प्रशासनाने म्हटले आहे.

गणेशोत्सवावर निर्बंध -

मुंबईत सुमारे २ लाख घरगुती गणपती तर सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मुंबईत अकरा दिवस गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्य़ान गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली तयार केली आहे.

निर्विघ्न विसर्जन व्हावे हाच प्रयत्न -

नागपूर खंडपीठाने नैसर्गिक ठिकाणी गणेश मुर्तींचे विसर्जन करू नये, असे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन केले जाईल. बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावे हाच आमचा प्रयत्न असून त्यासाठी मुंबईमधील विसर्जन स्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पालिका प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनासाठी येणा-या मूर्ती चौपाटीबाहेरच स्वत:कडे घेऊन विसर्जीत करतील. त्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. बाप्पाबद्दलच्या संवेदना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेऊ. गणेश विसर्जनाला मुंबईकर आले तर निर्विघ्न विसर्जन व्हावे हाच प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले. विसर्जनावेळी नागरिक गर्दी करू नयेत यासाठी कृत्रीम तलावांची संख्या वाढवणार आहे. ५०० मीटरच्या अंतरावर तलाव असतील असा प्रयत्न करणार आहोत, अशीही माहिती महापौरांनी यावेळी दिली.

Last Updated :Sep 11, 2021, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.