ETV Bharat / city

राज्यात 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी; काय सुरू, काय बंद?

author img

By

Published : Sep 30, 2020, 8:26 PM IST

Updated : Oct 1, 2020, 7:29 PM IST

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील हॉटेल, बार बंद आहेत.

mantralaya
संग्रहित छायाचित्र

मुंबई - मिशन बिगीन अगेन अंतर्गत 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच डबेवाल्यांनाही ट्रेनमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआर कोड काढून डबेवाल्यांना प्रवास करावा लागणार आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील हॉटेल, बार बंद आहेत. सध्या अनलॉकची प्रकिया सुरू असून, त्यानुसार आता 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

  • हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार
  • ५० % क्षमतेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी
  • डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणार
  • डबेवाल्यांसाठी क्यूआर कोड देण्यात येणार
  • राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी
  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
  • मेट्रो सेवासुद्धा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
  • सिनेमागृह, स्विमिंगपूल, इंटरटेन्मेंट पार्क, थिएटर बंद राहणार
  • नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधणकारक आहे.

मंत्रीमंडळ बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय -

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 पर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सहकारी संस्थांना निवडणूक, वार्षिक सर्वसाधारण सभा, लेखापरिक्षण तसेच पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ याबाबतीत कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील विविध कलमात देखील सुधारणा करण्यात येतील.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 27 मधील तरतुदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कायद्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत घेणे शक्य नाही. यामुळे संस्थांमधील सभासद अक्रियाशील होवून भविष्यात संस्थेच्या होणाऱ्या निवडणूकीत मतदार यादीतून वगळले जावून, मतदानापासून वंचित राहू शकतात. ही बाब टाळण्यासाठी कलम 27 मध्ये सुधारणा करण्यात आली. तसेच कलम 75 मध्ये सुधारणा करुन सहकारी संस्थांना वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यासाठी, 31 मार्च 2021 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे.

कलम 81 मधील तरतुदीनुसार प्रत्येक संस्थेला वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून 4 महिन्यांच्या कालावधीत आपले लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या उद्रेकामुळे दिलेल्या मुदतीत लेखापरिक्षण अहवाल सादर करणे शक्य नसल्याने लेखापरिक्षण अहवाल 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करण्याच्या कालावधीत वाढ करण्यासाठी कलम 81 मध्ये कलमात सुधारणा करण्यात आली.

तसेच, कलम 154 बी चे पोटकलम 19 मध्ये समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा व पदाधिकारी यांचा कार्यकाल नव्याने अस्तित्वात आलेल्या पहिल्या समितीच्या बैठकीच्या दिनांकापासून 5 वर्षांचा असेल अशी तरतूद आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये व शासनाच्या निर्देशाच्या अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्यामुळे गृहनिर्माण संस्थेच्या विद्यमान समितीने नवीन निवडून येणारे संचालक मंडळ गठीत होईपर्यंत त्यांचे कामकाज करण्यासाठी या कलमात सुधारणा करण्यात आली आहे.

वृक्ष संरक्षण व जतनासंदर्भात विषयक

कायद्याचे नियमन आता पर्यावरण विभागामार्फत

वृक्ष संरक्षण व जतनासंदर्भात विषयक कायद्याचे नियमन आता नगरविकास विभागाऐवजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

वातावरणीय बदलाच्या दृष्टीने पर्यावरण विभागातर्फे कृती आराखडा विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असून यामध्ये वृक्ष लागवड, अस्तित्वातील वृक्षांचे जतन व संगोपन हे मुख्य उद्दीष्ट आहे. त्यामुळेच सदरील महत्त्वाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला.

वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टच्या भाडेपट्ट्याचे सुधारीत दराने नुतनीकरण

प्रसिद्ध बासरीवादक श्री.हरिप्रसाद चौरसिया यांच्या वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आलेल्या अंधेरी येथील ८०० चौ.मी शासकीय जमिनीच्या सुधारीत दराने भाडेपट्ट्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या संस्थेस २ फेब्रुवारी १९९१ पासून १ फेब्रुवारी २०२१ अशा तीस वर्षाच्या कालावधीसाठी सवलतीच्या दराने म्हणजेच १९७६ च्या जमिनीच्या किंमतीच्या दोन टक्के दराने वार्षिक भुईभाडे आकारुन वसूल करण्यास मान्यता देण्यात आली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठास शेती महामंडळाची शेतजमीन

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची मालेगाव तालुक्यातील मौजे काष्टी येथील २५० हेक्टर शेतजमीन राहूरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कृषि विज्ञान संकुल स्थापन करण्याकरिता हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.

या जमिनीची किंमत १४ कोटी ८ लाख ८२ हजार ३२० इतकी असून ही रक्कम शेती महामंडळाने राज्य शासनाकडून घेतलेल्या व्याजाच्या रक्कमेतून वजा करण्यात येईल.

संगमनेरमधील २ शाळांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे २० टक्के अनुदान

संगमनेरमधील २ शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने हे अनुदान १ नोव्हेंबर २०१६ पासून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

अंजुमन प्राथमिक स्कुल संगमनेर व सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर संगमनेर या दोन शाळांमधील एकूण ८ पदांना हे २० टक्के अनुदान देण्यात येईल.

याअनुषंगाने या शाळांना जून २०१२ ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत नियमबाह्यरित्या क्षेत्रीय स्तरावरुन अनुदान वितरीत करण्यात आले होते. सदर शाळांना शासनस्तरावरुन अनुदान मंजूर झालेले नाही ही बाब निदर्शनास आल्यावर या दोन्ही शाळांचे अनुदान बंद करण्यात आले होते. या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती.

या नियमबाह्य वेतन अनुदान प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

आरे वृक्षतोड : आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश गृह विभागास दिले.

Last Updated :Oct 1, 2020, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.