ETV Bharat / city

'लालपरी'ला ७२ व्या वर्धापनदिनी मिळणार "मालवाहतुकीची" संजीवनी

author img

By

Published : May 31, 2020, 4:05 PM IST

ST bus
मालवाहतूक करणारी एसटी

एसटीकडे स्वतःची 300 मालवाहू वाहने उपलब्ध आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून झाला.

मुंबई- लालपरी म्हणून परिचित असलेली परिवहन महामंडळाची एसटी 1 जून रोजी 72 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने तोटा सहन करणाऱ्या एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने 72व्या वर्धापनदिनी नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले.

शासनाने 18 मे रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते. त्यासाठी आवश्यकता असल्यास जुन्या एसटी बसेसमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांचे रुपांतर मालवाहू वाहनांत करून त्याद्वारे ही मालवाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सध्या एसटीकडे स्वतःची 300 मालवाहू वाहने उपलब्ध आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून झाला. एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. जवळ जवळ प्रत्येक तालुकास्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर 31विभागीय कार्यालये, 33 विभागीय कार्यशाळा असा, मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.

सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून त्यांच्या मार्फत एम.आय.डी.सी, कारखानदार, लघुद्योजक, कृषिजन्य व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाचे अनेक महामंडळे, व्यापार मंडळे आपला माल एसटीच्या मालवाहतुकी मधून पाठवण्यास उत्सुक आहेत. गेल्या 6 दिवसात राज्यभरात 41ट्रक साठी मालवाहतुकीचे बुकिंग प्राप्त झाले आहे. पुणे, नाशिक,सातारा, सांगली, जळगाव व गडचिरोली या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.