मुंबई - बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शनिवारी (आज) एनसीबीने अभिनेता अरमान कोहली यांच्या निवासस्थानी धाड टाकली. या धाडसत्र दरम्यान एनसीबीचे डायरेक्टर अधिकारी समीर वानखेडे स्वतः उपस्थित होते. या छापेमारी दरम्यान अरमान कोहलीच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहे. अरमान कोहलीच्या निवासस्थानासोबतच नवी मुंबई, वाशी, मुलुंड, बांद्रा, खारघर, विरार येथे धाडसत्र सुरू आहे.
एनसीबीने अभिनेता एजाज खान याला अटक केली आहे. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही अटक केली आहे. एजाज खान याची चौकशी सुरू असताना त्याने काही महत्त्वाची नावं एनसीबीला दिली. याच मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने अभिनेता गौरव दीक्षित याला कालच (शुक्रवारी) अटक केली. गौरव दीक्षित यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने अभिनेता अरमान कोहलीच्या घरी धाड टाकली. या धाडीमध्ये एनसीबीला अमली पदार्थ मिळाल्याची माहिती आहे. स्वतः समीर वानखेडे अरमान कोहलीच्या घरी छापेमारी दरम्यान उपस्थित होते. या छापेमारी दरम्यान अरमान कोहलीला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे अरमान कोहलीने स्पष्ट दिली नाहीत. त्यामुळे त्याला अधिकृत रित्या समन्स बजावला आणि त्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने अरमान कोहलीला ताब्यात घेतले.
हेही वाचा - वसईत अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार; रेल्वे पोलिसांकडून तिघांना अटक