अन्न वाटपात पालिका प्रशासनाकडून 130 कोटींचा घोटाळा, रवी राजांचा आरोप; चौकशीची मागणी

author img

By

Published : Oct 21, 2021, 7:34 PM IST

food distribution scam allegation ravi raja

मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना प्रसाराच्या काळात विस्थापित आणि कष्टकरी कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून पालिकेने विनामुल्य जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले. या अन्न वाटपामध्ये महापालिका प्रशासनाने तब्बल १३० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना प्रसाराच्या काळात विस्थापित आणि कष्टकरी कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून पालिकेने विनामुल्य जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले. या अन्न वाटपामध्ये महापालिका प्रशासनाने तब्बल १३० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. याबाबत पालिकेच्या नियोजन विभागातील सहाय्यक आयुक्त व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

माहिती देताना रवी राजा

हेही वाचा - शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेला हिंदु-मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न - पटोले

अन्न वाटपाची माहिती नाही -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर काही दिवसांत रुग्णसंख्या वाढल्याने देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान विस्थापित आणि कष्टकरी लोकांची उपासमार होऊ लागल्याने राज्य सरकारच्या निर्णयानुसार पालिकेने अन्नाची पाकिटे बनवून वाटप करण्यास सुरुवात केली. हे अन्न वाटप कोणाला व कुठे केले, किती लोकांना केले याची चौकशी करण्याची मागणी केली होती. गेले दीड महिना याची चौकशी पालिकेच्या लेखा विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, अशा प्रकारचे अन्न वाटप कुठे आणि कोणाला केले, किती पाकिटांचे वाटप केले, याची कोणतीही माहिती पालिकेच्या विभाग कार्यालयांकडे नसल्याचे उघड झाल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

राज्य सरकारने निधी दिला नाही -

लॉकडाऊन दरम्यान मुंबई महापालिकेने अन्नाचे पाकीट बनवून वाटप केले. यासाठी राज्य सरकार महापालिकेला निधी देणार होते. पालिका अन्न वाटपावर १३० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगत आहे. राज्य सरकरने यासाठी फक्त १८ कोटींचा निधी दिला असल्याचे रवी राजा यांनी संगितले.

अधिकाऱ्यांची चौकशी करा -

मुंबई महापालिकेकडून कोविड काळात करण्यात आलेल्या अन्न वाटपाची चौकशी करण्यासाठी दीड महिन्यापूर्वी पत्र दिले होते. त्यानुसार पालिकेच्या लेखा परीक्षकांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांना उपयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. यामुळे नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त हसनाळे व इतर अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली.

दररोज ४ लाख ६१ हजार पाकिटांचे वाटप -

कोविड काळात लॉकडाऊनदरम्यान मुंबईत अडकलेल्या विस्थापित आणि कष्टकरी कामगारांसाठी २८ मार्चपासून विनामुल्य जेवणाची पाकिटे वाटप केली आहेत. बेस्ट प्रशासनाच्या ४८ बसेसद्वारे पालिकेच्या २४ विभाग कार्यालयात ७३४ केंद्रांवर दररोज ४ लाख ६१ हजार १०० तयार जेवणाची पाकिटे वाटप करण्यात आली आहेत. दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत गरजूना ही पाकिटे वाटप करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित राज्य शासन सकारात्मक - मंत्री अमित देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.