ETV Bharat / city

'कोरोनाच्या नावावर राज्य सरकार अधिवेशन गुंडाळणार'

author img

By

Published : Feb 17, 2021, 7:10 PM IST

Updated : Feb 17, 2021, 7:32 PM IST

prakash
prakash

कोरोनाच्या मुद्द्यावरून अधिवेशन आटोपल जाईल, कोणालाही अधिवेशनावर आंदोलने करू दिली जाणार नाहीत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

औरंगाबाद - राज्याचे अधिवेशन एक मार्चपासून सुरू होत आहे ते 15 मार्चपर्यंत गुंडाळले जाईल, त्याआधीच कोरोनाची भीती सर्वसामान्यांच्या मनात घालायला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून अधिवेशन आटोपल जाईल, कोणालाही अधिवेशनावर आंदोलने करू दिली जाणार नाहीत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत झालेल्या आदिवासी मेळाव्यात केला.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य सरकारवर टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आपण सर्वच जबाबदार आहोत. एखाद्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख निवडताना तो कसा संवाद साधतो, कशा पद्धतीने घरातील लोकांशी वर्तन करतो. यावर ते अवलंबून असते. मात्र कुटुंब प्रमुख जर स्वार्थी असेल तर मात्र त्याचे काय खरे नसते. असेच काहीसे पूजा चव्हाण प्रकरणी घडले. कुटुंबप्रमुखाने आपल्यासोबत हुशार आणि चांगले लोक ठेवले पाहिजेत. मात्र रात्री आठनंतर बसणारे सोबत ठेवले असतील तर मात्र कसे होईल. आपण कुटुंबप्रमुख तसा निवडला, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी केली.

शेतकरी आंदोलनप्रकरणी मोदींवर टीका

गेल्या 80 दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची केंद्र सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांना न्याय दिल्याने मोदींच्या घरात चूल पेटणार नाही का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव अशी परिस्थिती आहे, त्यांना सर्वांनी विनंती करून त्यांच्या बायकोला किमान एक दिवस तरी राष्ट्रपती भवन, पंतप्रधान यांचे निवासस्थान या गोष्टी दाखवायला पाहिजेत. जो व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो इतरांना काय देईल, असा टोला त्यांनी मोदींना लगावला.

नोकर भरतीसाठी आदिवासी युवकांनी मोर्चा काढावा

राज्य सरकार जात वैधता प्रमाणपत्रामध्ये आदिवासी युवकांना डावलत असून त्यांनी भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ नये, असे राजकीय नेत्यांना आणि सरकारला वाटते, असा आरोप त्यांनी केला. आदिवासी युवकांनी आगामी काळामध्ये मोर्चा काढावा, तेव्हाच आपल्या मागण्या पूर्ण होतील, अन्यथा आपल्याला दाबण्याचा षड्यंत्र हे सरकार कायम करत राहील, असे आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

वीजबिलात 25 टक्क्यांची वाढ

कोरोनाकाळात नागरिकांनी जास्त वीज वापरली, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. मात्र नागरिकांनी वीज जास्त वापरलेली नाही. वीज बिल माफ करावे, ही मागणी आहे. पण या चोरांना पैसे खायची सवय आहे ज्याच्या नावाने तिजोरी भरण्याचे काम राज्य सरकार करत आहे. कोरोना काळात तिजोरीवर आलेला आर्थिक भार, हा वीज बिलाच्या मार्फत भरण्याचे काम राज्य सरकार करत आहे. मोदी सरकार आणि राज्य सरकार एकाच माळेचे मणी असून, राज्य सरकार विजेत तर मोदी सरकार इंधनात चोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Last Updated :Feb 17, 2021, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.