ETV Bharat / briefs

वीज देयक सक्तीने वसूल करू नये, ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या महावितरणला सूचना

author img

By

Published : Jul 7, 2020, 10:19 PM IST

State minister prajakt tanpure
State minister prajakt tanpure

1 एप्रिल पासून विजदारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वीज बिल जास्त दिले, असे वाटत असल्यामुळे त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करावे. तसेच प्रत्येक स्लॅबचा योग्य फायदा नागरिकांना वीज बिलात देण्यात यावा, असे तनपुरे म्हणाले.

वर्धा- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद पडले असून सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही. त्यातच अमाप वीजबिलाची भर पडली आहे. नागरिकांच्या वीजबिल संदर्भातील समस्या जाणून घेऊन लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्याचे विज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी. वीज बिल सक्तीने वसूल करू नये, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिल्या.

तनपुरे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विज बिलासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी संदर्भात शिववैभव सभागृह येथे बैठक पार पडली. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज मिळावी. तसेच समाजातील शेवटच्या माणसाला वीज देण्याचे शासनाचे धोरण आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात मिटर रीडिंग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. रीडिंग झाले नसल्यास प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर वीज बिल कमी करण्यात येईल. महावितरणने सरासरी वीज बिल पाठवले असले तरी नागरिकांकडून सक्तीने वसूली केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महावितरणने नागरिकांना वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या व शंकांचे संपूर्ण समाधान करावे. तसेच ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करून घ्यावे, असे आवाहनही तनपुरे यांनी केले. तसेच, महावितरणने यासाठी कंट्रोल रूम तयार करून त्याचा टोल फ्री क्रमांक जनतेपर्यंत पोहचवावा आणि लोकांचे समाधान करावे असे सांगितले.

1 एप्रिल पासून विजदारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वीज बिल जास्त दिले, असे वाटत असल्यामुळे त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करावे. तसेच प्रत्येक स्लॅबचा योग्य फायदा नागरिकांना वीज बिलात देण्यात यावा, असेही तनपुरे म्हणाले. यावेळी अधीक्षक अभियंता यांनी वीजबिल संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी ग्राहक पंचायत घेऊन यामध्ये 2 हजार 300 ग्राहकांच्या समस्या सोडविल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील नागरिकांच्या तक्रारी तिथेच सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती दिली.

लॉकडाऊनच्या काळात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांनी अतिशय चांगले काम केले आहे. तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे वीज वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अतिशय कौशल्याने आणि काळजीपूर्वक वीज पुरवठा जास्त वेळ खंडित राहणार नाही यासाठी 24 तास काम केले. यासाठी तनपुरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील केले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सुरेश वानखेडे, कार्यकारी अभियंता, गोतमारे, माजी आमदार सुरेश देशमुख, सुनील राऊत, यासह वितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.