ETV Bharat / bharat

लखीमपूर खीरी येथे नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम...

author img

By

Published : Oct 4, 2021, 9:13 AM IST

Updated : Oct 4, 2021, 6:44 PM IST

लखीमपूर खिरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे.

lakhimpur kheri
lakhimpur kheri

लखीमपूर खेरी - उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज सकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट दिली. तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव देखील घटनास्थळी पोहोचणार आहे.

रविवरी नेमकं काय घडल? -

रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करणात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा क्रुर प्रकार; शरद पवारांकडून लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध

घटनेसंदर्भात अजय मिश्रा यांची प्रतिक्रिया -

दरम्यान, या घटनेसंदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी प्रतिक्रिया देताना, या घटनेत माझ्या मुलाची कोणतीही भूमिका नाही. काही समाज कंटकांनी शेतकऱ्यांच्या वेशात येऊन ही घटना घडवली, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना आणि गाडीच्या चालकालाही मारहाण झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रियंका आणि राहुल गांधी शुल्लक कारणांवरून राजकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री गोरखपूर दौरा सोडून परतले -

या घटनेची माहिती मिळताच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपला गोरखपूर दौरा अर्धवट सोडून लखनऊला परतले. तसेच त्यांनी एडीजी (कायदा व सुवव्यस्था) प्रशांत कुमार यांना लखीमपूर खेरी येथे पोहोचण्याचेदेखील आदेश दिले. त्यांनी डीजीपी मुकुल गोयल यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावले असून येथे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेणार आहेत. यासोबतच लखीमपूर खेरी जिल्ह्यात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

शासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश लागू -

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने तेथे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आज लखीमपूर खिरी जिल्ह्यातील घटना पाहता तेथे कलम 144 लावण्यात आला आहे. येथील परिस्थिती सामान्य होईपर्यंत, जिल्ह्याच्या सीमेवर कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे नेते/कार्यकर्ते एकत्र येण्यास किंवा प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस आणि प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. यासोबतच लखीमपूरच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एडीजी एलओच्यावतीने लखीमपूरच्या आसपासच्या संबंधित पोलीस ठाण्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर पोलिसांना शेतकरी नेत्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - School Reopen : आजपासून शाळांची घंटा वाजणार; 'अशी' असेल व्यवस्था

Last Updated :Oct 4, 2021, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.