ETV Bharat / bharat

Har Ghar Tiranga : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज जन्मदिन, जाणून घ्या, त्यांचे योगदान

author img

By

Published : Aug 2, 2022, 11:29 AM IST

Updated : Aug 2, 2022, 1:00 PM IST

भारताचा राष्ट्रध्वज ( indian flag ) बनण्यामागेही मोठी गोष्ट आहे. एका रात्रीत कल्पना सुचली आणि ती मान्य झाली असे नव्हते घडले. राष्ट्रध्वज बनण्यासाठीही बराच काळ लागला. 1921 मध्ये राष्ट्रध्वजांचे डिझाईन सादर केले गेले. यानंतर 1931 मधील काँग्रेसच्या बैठकीत या ध्वजाला अधिकृत मान्यता मिळाली

Har Ghar Tiranga
Har Ghar Tiranga

हैदराबाद - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जसे वेगवेगळ्या घोषणा आणि गीतांचे योगदान होते. तसेच राष्ट्रध्वजाचेही यात मोठे योगदान राहिले आहे. देशाच्या एकात्मतेचे प्रतिबिंब असणारा राष्ट्रध्वज ( indian flag ) देशवासीयांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यात महत्वाचा घटक ठरला आहे. पिंगाली वेंकय्यांनी ( Pingali Venkayya ) हा राष्ट्रध्वज तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे.

राष्ट्रध्वजाचे रचनाकार तेलुगू - पिंगाली वेंकय्या हे तेलुगू आहेत. त्यामुळे भारताच्या एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार तेलुगू आहेत. पिंगाली वेंकय्या यांनी देशाच्या राष्ट्रध्वजाचे मूळ डिझाईन सर्वप्रथम सादर केले होते. उच्चशिक्षित, बहुभाषिक आणि कृषी व साहित्याचा सखोल अभ्यास त्यांच्याकडे होता. वेंकय्यांनी राष्ट्रध्वजाचे डिझाईन तयार करून महात्मा गांधींसमोर सादर केले होते. यात महात्मा गांधींनी काही सुधारणा सुचविल्यानंतर देशाचा आजचा राष्ट्रध्वज अस्तित्वात आला आहे.

पिंगाली वेंकय्यांविषयी थोडक्यात माहिती - पिंगाली वेंकय्या यांचा जन्म कृष्णा जिल्ह्यातील भटलापेनुमर्रु येथे 2 ऑगस्ट 1876 रोजी झाला. देशभक्तीची भावना बालपणापासूनच त्यांच्या मनात प्रबळ होती. त्या परिणाम स्वरूपी 19 व्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील बोर युद्धात सहभाग घेतला. येथूनच त्यांची महात्मा गांधींसोबतची मैत्री वाढत गेली.

1921 मध्ये सादर केले डिझाईन - 1921 मध्ये बेझावाडा येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधींनी वेंकय्यांना केशरी, हिरव्या आणि पांढऱ्या रंगातील ध्वज तयार करण्यास सांगितले होते. 31 मार्च आणि 1 एप्रिल 1921 दरम्यान झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बेझावाडातील बैठकीतील चर्चेनंतर तिरंगा ध्वाजाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. कस्तुरबा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, बाबू राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी आणि तंगुतुरी प्रकासम या नेत्यांचा या बैठकीत सहभाग होता. राष्ट्रध्वजासाठी महात्मा गांधींनी वेंकय्यांवर विश्वास दाखविला होता. तिरंग्यावर एकमत होण्यापूर्वी वेंकय्यांनी राष्ट्रध्वजासाठी सुमारे 30 डिझाईन सादर केले होते ( Venkayya submitted 30 designs of national flag ).

तिरंग्यावर झाले होते काही आक्षेप - या ध्वजावर समाजातील काही अन्य घटकांकडून आक्षेपही घेण्यात आला होता. ध्वजामध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायाला इतर समुदायांपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप इतर समुदायाकडून करण्यात येत होता. सर्वांना मान्य असेल असा राष्ट्रध्वज तयार करण्याची मागणी यानंतर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने भोगराजू पट्टभी सितारमय्या आणि वल्लभभाई पटेल ( VallabhBhai Patel ) तसेच जवाहरलाल नेहरू ( Jawaharlal Nehru ) या नेत्यांचा सहभाग असलेली एक विशेष समिती यावर विचार करण्यासाठी तयार केली होती. यानंतर काँग्रेसने केशरी रंगाच्या ध्वजावर लाल रंगाच्या चरख्याचे डिझाईन सुचविले होते. मात्र वेंकय्यांच्या ध्वजाला सामान्यांमध्ये मिळणारी पसंती बघता हाच ध्वज कायम ठेवण्याचा निर्णय 1931 च्या बैठकीत घेण्यात आला. यात थोडी सुधारणा काँग्रेस कार्यकारीणीकडून गरज पडल्यास सुचविली जाऊ शकते असे म्हटले गेले.

अभ्यासाअंती तयार केले 30 डिझाईन - महात्मा गांधींचे ( Mahatma Gandhi ) अनुयायी आणि सच्चे स्वातंत्र्यसेनानी असलेल्या वेंकय्यांना राष्ट्रध्वजातून देशाचे प्रतिबिंब उमटावे असे वाटत होते. 1916 मध्ये एका पुस्तकात त्यांनी याची संकल्पना मांडली होती. भारतासाठी राष्ट्रध्वज असे नाव असलेल्या या पुस्तकात त्यांनी राष्ट्रध्वजासाठी 24 डिझाईन मांडल्या होत्या. 1921 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास करून 30 वेगवेगळ्या डिझाईन तयार केल्या. हे डिझाईन्स त्यांनी महात्मा गांधींसमोर सादर केले होते. महात्मा गांधींनी पिंगाली वेंकय्यां यांच्या प्रयत्नांचे कौतूक केले. सत्यात मात्र यापैकी एकही डिझाईन त्यांना आवडले नव्हते. यानंतर महात्मा गांधींनी वेंकय्यांना काही सूचना केल्या. ध्वजामध्ये पांढऱ्या रंगाचा आणि धार्मिक एकात्मतेच्या चिन्हाचा समावेश असावा असे त्यांनी सुचविले. यावेळी लाला हंसराज यांनी चरख्याचा समावेश करावा असे सुचविल्यावर महात्मा गांधींनी याला सहमती दर्शविली. महात्मा गांधींच्या सूचनांनुसार नवे डिझाईन तयार करण्यास वेळ लागला. त्यामुळे बेझावाडा येथील बैठकीत त्याला मंजुरी मिळू शकली नाही. यानंतर 1931 मधील काँग्रेसच्या बैठकीत या ध्वजाला अधिकृत मान्यता मिळाली ( 1931 Congress approved tricolor flag )

स्वातंत्र्यानंतर अशोक चक्राचा समावेश - स्वातंत्र्यानंतर ध्वजातील चरख्याऐवजी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला ( Ashoka Chakra was added instead of spinning wheel ) . मात्र ही सुधारणा महात्मा गांधींच्या इच्छेविरोधात होती. राष्ट्रध्वजासाठी 1921 मध्ये एका तेलुगु युवकाने डिझाईन सादर केले होते. पिंगाली वेंकय्यांनी एकट्याने राष्ट्रध्वज डिझाईन केले हे निश्चितपणे सांगता येत नाही, असे सरकारच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. काही तज्ज्ञांच्या मते वेंकय्यांनी सादर केलेल्या मूळ डिझाईनमध्ये अनेक बदल झाले. काही इतिहासकारांच्या मते राष्ट्रध्वजात अशोक चक्राचा समावेश करण्याचा प्रस्ताव नेहरूंनी मांडला होता. नेहरूंच्या एका निकवर्तीयांच्या पत्नीची ही संकल्पना होती असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. यावरून या महिलेला राष्ट्रध्वजाची डिझायनर मानले जावे असे काहींचे म्हणणे आहे. मात्र या दाव्यासाठी कसलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळेच बहुसंख्य लोकांकडून पिंगाली वेंकय्यांनाच राष्ट्रध्वजाचे रचनाकार समजले जाते.

असा आहे राष्ट्रध्वज - आपल्या राष्ट्रध्वजात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या समान आकाराच्या तीन पट्ट्या आहेत. राष्ट्रध्वजाची रुंदी आणि उंचीचे प्रमाण 3:2 इतके आहे. वेंकय्यांनी डिझाईन केलेला राष्ट्रध्वज ( national flag ) देशासाठी कायम आदरणीय असणार आहे. चरख्याच्या जागी अशोकचक्र याशिवाय इतर कोणतीही सुधारणा त्यांच्या मूळ डिझाईनमध्ये करण्यात आलेली नाही.

हर घर तिरंगा अभियान: जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन दिले जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हे महत्त्वाचे अभियान आहे.

हेही वाचा - Ashok Chavan leaving Congress : अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार? पाहा काय दिले स्पष्टीकरण

Last Updated : Aug 2, 2022, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.