ETV Bharat / bharat

Shiv Sena: शिवसेनेचा ताक फुकून पिण्याचा निर्णय! मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने खासदारांचे बंड थांबणार का? वाचा, सविस्तर

author img

By

Published : Jul 13, 2022, 3:41 PM IST

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. द्रोपती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा यासाठी शिवसेनेचे खासदार आग्रही होते. ( Presidential Candidate Draupadi Murmu ) यासाठी घेतलेल्या बैठकीत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव बनवल्याने उद्धव ठाकरेंना पाठिंब्याचा निर्णय घ्यावा लागला अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचा मुर्मू यांना पाठिंबा
शिवसेनेचा मुर्मू यांना पाठिंबा

मुंबई - तब्बल चाळीस आमदारांनी एकदाच बंड केलं. इतकेचं नाही तर बंड केलेल्या आमदारांतील एकनाथ शिंदे नवे मख्यमंत्री झाले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली खुर्ची गमवावी लागली. आता त्यांनी बाहेर कितीही अलबेल आहे असे दाखवले असले, तरी आभाळ फाटलय याची जाणीव त्यांना आहे. या परिस्थितीची पुर्ण खबरदारी घेऊन त्यांनी ताक फुकून पेण्याचा निर्णय घेतलाय. ( Shiv Sena Support To Murmu ) सर्व खासदारांचा रोख पाहता त्यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेला बाजूला ठेऊन, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या निर्णयावर राज्यात राजकीय नेतेमंडळींसह राजकीय विश्लेषकांनीही उलट-सुलट चर्चा सुरू केली आहे. आमदार आणि पाठोपाठ खासदारांनी देखील पक्षात बंड करू नये. यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत असले तरी, बंडाच्या पवित्र्यात असलेले खासदार यापुढेही बंड करू शकतील अशी शक्यता विश्‍लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

कटू संबंधांमुळे द्रोपती मुर्मू यांना पाठिंबा - राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला निवडणूक होणार आहे. मात्र, त्याआधी महाराष्ट्रात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून घमासान पाहायला मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेत राष्ट्रपती पदासाठी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा या मुद्द्यावर पक्षात चांगलेच वादंग उठले होते. एनडीएकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला होता. भारतीय जनता पक्षासोबत उद्धव ठाकरे यांचे निर्माण झालेले कटू संबंधांमुळे द्रोपती मुर्मू यांना पाठिंबा न देण्याचा विचार उद्धव ठाकरे यांचा होता.

मातोश्री पासून दुरावा बनवून ठेवला - सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडावी लागली. अद्यापही बंडखोर करणाऱ्या चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्री पासून दुरावा बनवून ठेवला आहे. आमदारांनी घेतलेल्या पवित्र्यानंतर खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा शिवसेना गोटात आणि राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा यासाठी उद्धव ठाकरे यांनी 12 जुलैला आपल्या मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बंडखोर आमदारांचे प्रतिनिधित्व - ही बैठक पाच-तास चालली. त्यानंतर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र, या बैठकीत भारतीय जनता पक्षाशी उद्धव ठाकरे यांनी जुळवून घ्यायला हवे असा सूर बहुतांश खासदारांचा होता. भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात मोठी ताकद उभी केली आहे. तसेच, शिवसेनेचे बंडखोर आमदार भाजप सोबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व बंडखोर आमदारांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करण्यात कोणतीही हरकत नाही असाही सूर या बैठकीत निघाल्याची चर्चा आहे.

द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर - बंड केलेले सर्व आमदार अद्यापही कोणत्या पक्षात गेले नाहीत. ते शिवसेना पक्षात आहेत असे सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास भारतीय जनता पक्षाला सोबत चर्चेची दारं खुली राहतील. अशी चर्चा या बैठकीतून खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केली. तसेच, या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक खासदाराचे खाजगीत मत जाणून घेतले. त्यानंतर द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.


उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर राऊत नाराज - उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित असलेल्या 13 खासदारांपैकी जवळपास सात ते आठ खासदारांनी द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव बनवला. खासदारांच्या दबावानंतर उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचो मान्य केले. मात्र, राज्यसभा खासदार संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय रुचलेला नाही. त्यामुळे खासदारांच्या बैठकीतून संजय राऊत बैठक संपण्याआधीच बाहेर पडले.

संजय राऊत नाराज - महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी संजय राऊत यांनी मोठे प्रयत्न केले होते. तसेच, सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संजय राऊत बोलत असतात. याचाही कुठे ना कुठे शिवसेना आमदार आणि खासदारांनी उल्लेख या बैठकीत केला. त्यामुळे खासदारांनी संजय राऊत यांच्यावर दाखवलेली नाराजी आणि उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय संजय राऊत रुचलेला नाही अशी चर्चा आहे.

खासदाराच्या बंडाची होती शक्यता - शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करून केलेली सत्ता स्थापना शिवसेनेत अनेक नेत्यांना रुचली नव्हती. याच मुद्द्यावरून आमदारांनी शिवसेने विरुद्ध बंड केले. त्यानंतर खासदारही बंडाच्या पवित्र्यात आले होते. त्यामुळे येणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने मतदान करावे असा आग्रह शिवसेनेच्या काही खासदारांनी धरला होता. मातोश्री बोलावण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदार उपस्थित होते. तर सहा खासदारांनी दांडी मारली होती. प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, राजन विचारे हे खासदार उपस्थित होते.

खासदारांनीही पक्षामध्ये बंड पुकारण्याची शक्यता - या बैठकीत अधिक तर खासदारांनी मुर्मु यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव बनवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सध्याची परिस्थिती पहात खासदारांच्या म्हणण्याप्रमाणे इंडियाचा राष्ट्रपती उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हा पाठिंबा जाहीर केला नसता तर, खासदारांनीही पक्षामध्ये बंड पुकारण्याची शक्यता होती. बहुतेक खासदारांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याशिवाय निवडून येण्याची शक्यता कमी वाटते. यामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, मुंबईतील धारावीचे खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार राजेंद्र गावित, खासदार धैर्यशील माने, खासदार सदाशिव लोखंडे यांनी भाजपाला पाठिंबा देण्याबाबत समर्थन दर्शवला आहे.

आमदारांनी केलेल्या बंडानंतर पुन्हा एकदा खासदारांचे बंड - या सर्व विरोधामुळे उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवला असता तर खासदारांनी देखील पक्षासोबत बंड पुकारले असते. त्यामुळे आमदारांनी केलेल्या बंडानंतर पुन्हा एकदा खासदारांचे बंड पक्ष हिताचे नसल्याचे उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे. त्यामुळे खासदारांचे मत जाणून घेऊन उद्धव ठाकरे यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे.

या खासदारांचा भाजपला खुला पाठिंबा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी, धारावीचे खासदार राहुल शेवाळे, खासदार सदाशिव लोखंडे आणि खासदार राजेंद्र गावित हे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या खुले समर्थनात आहेत. त्यातच राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित या दोन खासदारांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अशा आशयाचे पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ठाकरेंची चूक - आमदारांच्या पाठोपाठ पक्षामध्ये खासदारांनीही बंड करू नये यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनाविरुद्ध जाऊन द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, हा पाठिंबा जाहीर करावा यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच दबाव बनवला. या दबावाला उद्धव ठाकरे बळी पडले आणि इच्छा नसतानाही त्यांना मुर्मु यांना पाठिंबा द्यावा लागतोय. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर टाकण्या सारखे कृती आहे" असे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे व्यक्त केले आहे.

पुन्हा एकदा खासदारांनी पक्षासोबत बंड करू नये याची खबरदारी - शिवसेना पक्षात मोठे बंड झाल आहे. चाळीस आमदारांनी एकदाच पक्ष सोडल्याने पक्षाला आपल्या हातातली सत्ता गमवावी लागली. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा खासदारांनी पक्षासोबत बंड करू नये याची खबरदारी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय त्यांना भविष्यात अडचणीत आणणारा ठरणार आहे. कारण सध्याच्या शिवसेनेची परिस्थिती पाहिली तर राजकीय स्थैर्य यायला शिवसेनेला बराच वेळ द्यावा लागणार आहे. मात्र, त्याआधी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार भाजपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील असही ते म्हणाले आहेत.

काही दिवसातच हे बंड पुन्हा एकदा उफाळून येईल - आज जरी उद्धव ठाकरे यांनी द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन खासदारांचा बंड थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी भविष्यात दुसऱ्या मुद्द्यावरून हे खासदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आवाज उठवतील आणि भारतीय जनता पक्ष सोबत जाण्यासाठी कारण शोधतील. त्यामुळे आता बंड थांबले असे तरी, काही दिवसातच हे बंड पुन्हा एकदा उफाळून बाहेर येण्याची शक्यता विजय चोरमारे यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे च्या निर्णयावर काँग्रेस नाराज - महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबाबत काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत घेतलेल्या निर्णयाबाबत शिवसेनेने काँग्रेस सोबत चर्चा करायला हवी होती असही ते म्हणाले आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे असही ते म्हणाल आहेत.

ही संविधानिक लढाई आहे - स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत असही उद्धव ठाकरे यांना त्यांनी आठवण करून दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नेहमीच शिवसेना योग्य वाटेल त्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचा इतिहास आहे असे म्हणत शिवसेनेच्या निर्णयावर अधिक भाष्य करणे टाळले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊ, पाहा या ठिकाणांची परिस्थिती!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.