अहमदाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते जयनारायण व्यास (Jainarayan Vyas) यांनी आज औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Jainarayan Vyas joins Congress). काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांचे पक्षात औपचारिक स्वागत केले. जयनारायण व्यास यांनी ४ नोव्हेंबर रोजी भाजपचा राजीनामा दिला होता. गुजरातचे माजी आरोग्यमंत्री व्यास यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. जयनारायण व्यास यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर २० दिवसांनीच त्यांनी सिद्धपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांना पाठिंबा जाहीर केला होता.
माझी कोणावरही नाराजी नाही : मल्लिकार्जुन खरगे अहमदाबादमधील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "भाजप लोकांना काँग्रेसविरोधात भडकावत आहे. मात्र यावेळी भाजप घाबरला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय नेते आता वॉर्ड टू वॉर्ड प्रचार करत आहेत. काँग्रेसने इतक्या वर्षात एकही काम केले नाही, असे हे सर्व लोक आपल्या भाषणात सांगत आहेत". यावेळी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जयनारायण व्यास म्हणाले, "मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. गुजरातमध्ये आज त्याच योजना चालू आहेत ज्यांची पायाभरणी 1961 च्या आधी झाली होती. माझी कोणावरही नाराजी नाही. मी तसे राजीनाम्यात लिहिले आहे. जेव्हा मी भाजप सोडण्याचा विचार करत होतो तेव्हाच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाली. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवादी पक्ष आहे. मी पूर्ण विचार करूनच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये माझ्यावर जी काही जबाबदारी देण्यात येईल, ती मी चोखपणे पार पाडीन.