ETV Bharat / bharat

राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 7:30 PM IST

Rahul Gandhi
Rahul Gandhi

Bharat Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी पुढील वर्षी, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा असलेल्या 'भारत न्याय यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा टोन सेट करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश असेल. वाचा 'ईटीव्ही भारत'चे अमित अग्निहोत्री यांचा यासंबंधीचा खास रिपोर्ट.

नवी दिल्ली Bharat Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी पुढील वर्षी १४ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत पुन्हा एकदा देशव्यापी यात्रेला निघणार आहेत. हा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा असेल. भारत जोडो यात्रेनं दक्षिण-उत्तर असा प्रवास केला होता. ही यात्रा पूर्व-पश्चिम प्रवास करणार आहे. या यात्रेला 'भारत न्याय यात्रा' नाव देण्यात आलं असून, ती देशभरातील ९० लोकसभा मतदारसंघांतून जाईल. काँग्रेसच्या २०२४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं या यात्रेचं विशेष महत्व आहे.

या राज्यांतून जाणार यात्रा : 'भारत जोडो यात्रा' देशातील आर्थिक विषमता, राजकीय केंद्रीकरण आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या विरोधात होती. तर, 'भारत न्याय यात्रा' राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यावर भर देईल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या १४ राज्यांमधून प्रवास करेल.

लोकसभा निवडणुका दृष्टीक्षेपात : याबाबत काँग्रेसचे आसाम आणि मध्य प्रदेशचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी अधिक माहिती दिली. "पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्व करणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्यानं पक्षात नवचैतन्य आणलं होतं. आता दुसऱ्या टप्प्यातही तेच होईल अशी अपेक्षा आहे. हा एक व्यापक जनसंपर्क कार्यक्रम असेल", असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा उद्देश : पक्ष सूत्रांच्या मते, प्रारंभी, महात्मा गांधींचं जन्मस्थान असलेल्या गुजरातमधील पोरबंदर येथे ही यात्रा संपवण्याची योजना होती. परंतु नंतर ते ठिकाण मुंबईत हलवण्यात आलं. येथे २० मार्च रोजी विरोधी पक्षांच्या रॅलीचं आयोजन केलं जाऊ शकतं. भारत जोडो यात्रेनं समविचारी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आता हीच आघाडी I.N.D.I.A. म्हणून ओळखली जाते. माहितीनुसार, भारत न्याय यात्रेचा मार्ग सुमारे ६,२०० किमीचा असेल, जो भारत जोडो यात्रेच्या ४,००० किमी मार्गापेक्षा लक्षणीय वाढला आहे. मात्र यापैकी बहुतेक अंतर बसनं पूर्ण केलं जाईल.

मणिपुरातून सुरुवात होणार : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे १४ जानेवारी रोजी मणिपूरमधील इंफाळ येथून यात्रेला सुरुवात करणार आहेत. ईशान्येकडील हे संघर्षग्रस्त राज्य सामाजिक सलोखा आणि न्यायाचं प्रतीक बनलंय. आम्हाला मणिपूरच्या लोकांच्या जखमा भरून काढण्याची प्रक्रिया सुरू करायची होती, असं यात्रेच्या आयोजनात सहभागी असलेल्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पायी पदयात्रा आणि मतदारांशी संपर्क साधण्यासाठी अनेक छोटे-मोठे सार्वजनिक संवाद होणार आहेत.

कार्यकर्त्यांना उभारी मिळण्यास मदत होईल : नुकत्याच तीन हिंदी भाषिक राज्यांत (राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड) झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. ही यात्रा या राज्यांतून जाणार आहे. यामुळे येथील कार्यकर्त्यांना उभारी मिळण्यास मदत होईल. तसेच लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळण्याची देखील आशा निर्माण होईल. काँग्रेसला या तीन राज्यांमध्ये आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. तोच उद्देश गुजरातमध्ये साध्य होईल, जिथे ते २०२२ मध्ये हरले होते. तसेच २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसचा पराभव झाला होता.

उत्तर प्रदेशात दोन आठवडे घालवणार : भारत जोडो यात्रा पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांतून गेली होती. मार्गाच्या समस्येमुळे राहुल गांधी तेथे फक्त दोन दिवस घालवू शकले. यावेळी भारत न्याय यात्रा उत्तर प्रदेशात सुमारे दोन आठवडे घालवणार आहे. यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा उभारी मिळू शकते, असं उत्तर प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. भारत जोडोनंतर आता राहुल गांधींची 'भारत न्याय यात्रा'; कॉंग्रेस फुंकणार लोकसभेचं रणशिंग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.