ETV Bharat / bharat

काबूलमध्ये काय घडलं? अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेल्या सविता शाही यांचा थरारक अनुभव

author img

By

Published : Aug 20, 2021, 1:22 PM IST

medical-staff-kavita-shah-narrated-the-full-story-of-the-rescue-operation-in-afghanistan-who-returned-from-kabul
सविता शाही

अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेल्या सविता शाही यांनी आपला परतीच्या प्रवासाचा थरारक अनुभव सांगितला. सविता शाही यांनी अमेरिकन आर्मीच्या वैद्यकीय टीमसोबत काबुलमध्ये गेली 8 वर्षे काम केले होते.

डेहराडून - अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवला असून परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशिन अंतर्गत मायदेशी आणण्यात येत आहे. नाटो (North Atlantic Treaty Organization) आणि अमेरिकन आर्मीच्या वैद्यकीय टीमसोबत काबुलमध्ये गेली 8 वर्षे काम करणाऱ्या सविता शाही दोन दिवसांपूर्वीच सुरक्षितपणे डेहराडूनला पोहोचल्या आहेत. काबूलमधील परिस्थिती ईटीव्ही भारताने त्यांच्याकडून जाणून घेतली.

सविता शाही यांचा थरारक अनुभव

नाटो आणि अमेरिकन आर्मीच्या वैद्यकीय टीममध्ये काम करताना, अफगाणिस्तानमध्ये सर्व काही इतक्या लवकर बदलेल, असे वाटलेच नव्हते. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी तालिबानने अचानक काबूलवर कब्जा केला, त्यानंतर लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू केला, असे त्यांनी सांगितले.

रविवार, 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूल विमानतळ पूर्णपणे काबीज केले होते. त्यामुळे सर्व उड्डाणे बंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, 16 ऑगस्टच्या संध्याकाळी, नागरी विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या अमेरिकन सैन्याच्या लष्करी विमानतळाने वैद्यकीय टीमच्या सदस्यांसह इतर लोकांच्या बचावाची तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

सविता शाही सांगतात की, संध्याकाळी 6 च्या सुमारास अमेरिकन आणि नाटो सैन्याबरोबर काम करणारे लोक विमानतळाजवळ येताच अचानक तालिबान लढाऊंनी गोळीबार सुरू केला. अशा परिस्थितीत, सर्व लोकांना परत त्यांच्या छावणीत पाठवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत वाट पाहण्याची सुचना दिली, असे सविता यांनी सांगितले.

बाहेरची परिस्थिती अशी होती की सर्व लोक त्यांच्या मायदेशी परतण्याचा प्रयत्न करत होते. यातच भारतीय मुत्सद्दी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान लष्करी विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, त्या भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने, यूएस आर्मी मेडिकल कॅम्पमधील एकूण 7 लोक सकाळी 6.10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विमानात बसले. सकाळी साडेसातच्या सुमारास, भारतीय हवाई दलाचे विमान जामनगर, गुजरातसाठी 150 जणांना घेऊन निघाले, त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि: श्वास सोडला, असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.